मनोज जरांगेंचं उपोषण मागे; देवेंद्र फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा…

0
5

जालना, दि. 25 (पीसीबी) : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. अखेर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागील नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते. अखेर आज कोर्टाच्या निर्देशानसुार आपण उपचार घेत असून सलाईन लाऊन उपोषण करणे योग्य नाही, असे म्हणत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपोषण स्थगित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा करण्यापूर्वी आधी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. फडणवीस साहेब हाताने सत्ता घालवू नका. मराठा समाज वाट पाहतोय. नाहीतर आरक्षणासाठी आम्हाला सत्तेत बसावे लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा करताच तेथे उपस्थित असणाऱ्या मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आनंद साजरा केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, ‘सगेसोयरे’चा प्रश्न सोडवावा तसेच हैद्राबाद सातारा मुंबई गॅझेट करणे अशा विविध मागण्यांसाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून मराठा समाज बांधवांकडून मागणी करण्यात येत होती. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.