मणिपूर प्रकऱणात भाजपची सुप्रिम कोर्टावर टीका

0
415

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) : मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टानं केंद्रावर ताशेरे ओढत काहीतरी करा अन्यथा आम्हालाच पावलं उचलावी लागलीत, अशा शब्दांत इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे.भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल, अशा शब्दांत भातखळकरांनी सुप्रीम कोर्टाला टार्गेट केलं आहे.

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं होतं?
मणिपूरमध्ये गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून दोन समजांमध्ये जातीय हिंसाचार सुरु आहे. त्यातच गुरुवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. त्यानुसार, दोन महिलांचा विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं देशभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. मणिपूरमधील ही सर्वात टोकाची परिस्थिती समोर आल्यानं तीथं कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारही अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं अखेर सुप्रीम कोर्टानं सुओमोटो दाखल करुन घेत सीजेआय चंद्रचूड, न्या. नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

सरन्यायाधीशांनी म्हटलं की, मला वाटतं आता वेळ आली आहे की सरकारनं खरोखर पुढे यावं आणि कारवाई करावी, कारण हे सर्वस्वी अमान्य आहे. आम्ही सरकारला कारवाईसाठी थोडा वेळ देऊ पण यानतंरही ग्राऊंड लेव्हलवर काही कार्यवाही झाली नाही तर मग आम्हाला कारवाई करावी लागेल