भ्रष्ट महापालिका प्रशासनाचेच हे निष्पाप बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे

0
359

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहरात एका मेणबत्तीच्या कारखान्याला मोठी आग लागली असून, यात होरपळून सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तर, आगीत अनेक जण अडकलेले असल्यामुळं मृत व जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तळवडे एमआयडीसीमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागली आहे. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भ्रष्ट, निगरगट्ट, असंवेदनशील प्रशासनाच्या कामकाजाचे हे निष्पाप बळी असून प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी नागरिकाच्या वतीने करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात आगीचं सत्र सुरूच आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात आग लागल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.
यापूर्वी पूर्णनगर येथील हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री अग लागून अख्खे पाच जणांचे कुटुंब जाळून खाक झाले. त्यावेळी शहरातील सर्व इमारतीचे फायर ऑडिट करण्याची मागणी झाली. हजारो इमारतींना आग प्रतिबंधक यंत्रणा नाही किंवा त्याचे प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. लाचखोर प्रशासन पैसे घेऊन दुर्लक्ष करते असेही लक्षात आले. भोसरी येथील केमिलकल कारखान्यात लागलेल्या आगीत नऊ निष्पाप महिला जाळून खाक झाल्याची घटना आठवते. अशा अनेक घटना घडूनही भ्रष्ट प्रशासन बधलेले नाही.

आज मेणबत्तीच्या कारखान्यात लागलेल्या आगीत सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून, यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोदामात ज्वलनशील वासू असल्याने आग जलद गतीने पसरली. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं! आगीने क्षणार्धात पेट घेतल्यामुळे कामगारांना बाहेर पडायला वेळ मिळाला नाही आणि यातच निष्पाप जीवांचा बळी गेला.

आता प्रश्न हा उठतोय कि या मृत्यूला जबाबदार कोण? सरळ सरळ महानगरपालिकेचा निष्काळजीपणा यात दिसून येत आहे. शुक्रवारी दुपारी या गोदामाला आग लागली. या गोदामाला परवाना होता का? त्या ठिकाणी ज्वलनशीर वस्तू असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? हे प्रश्न आता निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासूनआगीच्या घटना सातत्याने घडत आहेत, यासंदर्भात काहीच उपाययोजना का होत नाहीत. या आगीत मृतांची संख्या मोठी आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनमध्ये चार सिलेंडर फुटले होते. मे महिन्यात महिन्यात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात मार्केट यार्डमधील हॉटेल रेवळ सिद्धी येथे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. जून महिन्यातच पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत प्रचंड नुकसान झाले होते. पुन्हा जुलै महिन्यात कोंढवा येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली. ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवडमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला.ऑक्टोंबर महिन्यात गाडयांच्या शोरुमला आग लागली होती. त्या आगीत २५ मोटारसायकल जळून खाक झाल्या. पुण्यातील वेस्टलँड मॉलला रेस्टॉरंटमध्ये २३ नोव्हेंबर रोजी आग लागली. यावेळी मॉलमध्ये असणाऱ्या सात हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या घटना लक्षात घेऊन शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत, यावर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.