भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले दहा वर्षांत 17 लाख कुटुंबे देशातून बाहेर

0
121

दि. २३ जुलै (पीसीबी) – भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मंडळी चांगल्या संधीची वाट पाहात असतात. आपल्या देशात शिक्षणाची चांगली संधी नाही, स्वत:ची चांगली प्रगती करण्याची संधी नाही की डॉलरमध्ये मिळणाऱ्या पगाराचे आकर्षण याबाबी उच्च मध्यमवर्गीयांना परदेशात नागरिकत्व घेण्यास खुणावत आल्या आहेत. परंतू जे भारतातच कोट्यधीश झाले आहेत असे चांगले सधन लोकही आता भारत सोडून चालले आहेत. असे नेहमी म्हटले जाते की जगात दर सात स्थलांतरीत हा भारतीय असतो. किंवा प्रत्येक मोठ्या देशात एक भारत वसलेला असतो. परंतू हेनेली एण्ड पार्टनर्सच्या या संस्थेच्या 2023 च्या आर्थिक वर्षांच्या मायग्रेशन अहवालाप्रमाणे भारतातून 5,100 करोडपतींनी आपला गाशा गुंडाळला आहे. तर यंदा 4,300 करोडपती देश सोडतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भारतातून परदेशात ब्रेन ड्रेन होत आले आहे. जगातील प्रत्येक मोठ्या आयटी कंपनीच्या सीईओपदी आता भारतीय वंशांच्या व्यक्तींचा दबदबा बनला आहे. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 संस्थेचा अहवाल काल जाहीर झाला आहे. भारतातून साल 2023 मधून 5,100 कोट्यधीश परदेशात स्थायिक झाले तर साल 2024 मध्ये आणखी 4,300 कोट्यधीश मंडळी परदेशात जातील असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. केवळ भारतातूनच नाही तर ज्या देशाने आपल्या देशावर एकेकाळी दीडशे वर्षे राज्य केले त्या ग्रेट ब्रिटनमधून देखील साल 2023 मध्ये 4,200 कोट्यधीशांनी देश सोडला होता. आता साल 2024 मध्ये त्याहून दुप्पट म्हणजे 9,500 करोडपती लोक सायबांचा देश सोडतील असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. 2022 मध्ये ग्रेट ब्रिटनमधून 1,600 करोडपतींनी देश सोडून परकीय देशांची भूमी स्वीकारली आहे.

अमेरिका आणि लंडन आता मागे पडले
आधी भारतातून परदेशात स्थलांतरीक होण्यासाठी अमेरिका आणि लंडनला प्राधान्य दिले जात होते. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळण्यासाठी आजही ओढा आहेच. अमेरिका आणि लंडन या शहरात स्थायिक व्हायला युरोपातील, आफ्रिका, आशिया येथील अनेक श्रीमंत कुटुंबांना सातत्याने प्रयत्न करीत होती. 1950 पासून ते 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत हा ट्रेंड होता. दशकभरापासून हा ट्रेंड उलटू लागला कारण अधिक करोडपतींनी हे देश सोडण्यास सुरुवात केली आणि कमी करोडपती आता देशात स्थायिक होण्यास तयार होतात. विशेष म्हणजे, ब्रेक्झिटनंतर 2017 ते 2023 या सहा वर्षांच्या कालावधीत ग्रेट ब्रिटनमधून एकूण 16,500 करोडपतींने स्थलांतर केले आहे. 2024 साठीचे अंदाज आणखी संबंधित आहेत, केवळ या वर्षासाठी 9,500 लक्षाधीशांचा निव्वळ निव्वळ प्रवाह अपेक्षित आहे.

श्रीमंत व्यक्तीचे स्थलांतर दाखविणारा तक्ता खालीलप्रमाणे :

युएई +6,700
अमेरिका +3,800
सिंगापूर +3,500
कॅनडा +3,200
ऑस्ट्रेलिया +2,500
इटली +2,200
स्वित्झर्लंड +1,500
ग्रीस +1,200
पोर्तुगाल +800
जपान +400

चीनला सर्वाधिक फटका
जगात चीनमधून यंदाच्या आर्थिक वर्षात सर्वाधिक 15,200 करोडपती देश सोडती असा अंदाज आहे. साल 2023 या आर्थिक वर्षात चीनमधून 13,800 कोट्यधीशांनी देश सोडला होता. भारत या यादीत ग्रेट ब्रिटननंतर तिसरा देश आहे. भारतातून 2023 मध्ये 5,100 करोडपतींनी आपला गाशा गुंडाळला आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षांत 4,300 करोडपती देश सोडतील असा अंदाज आहे. त्यानंतर दक्षिण कोरीयातून 1,200 करोडपती गाशा गुंडाळतील असा अंदाज आहे. साल 2023 मध्ये 800 करोडपती परदेशात वसले आहेत.

युक्रेन युद्धानंतर रशियातून स्थलांतर वाढले
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर या देशात भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी खास मोहीम राबवावी लागली आहे. परंतू त्यानंतर यंदा 1000 करोडपती रशियातून स्थलांतरीत होतील असे म्हटले जात आहे. साल 2022 मध्ये तब्बल 8,500 करोडपतींनी रशिया सोडला होता. त्यानंतर 2023 मध्ये 2,800 करोडपतींनी स्थलांतर केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

या वर्षी अभूतपूर्व अशा संख्येने 1,28,000 करोडपती लोकांचे जगभरात स्थलांतर होण्याची शक्यता आहे, साल 2023 मध्ये झालेल्या 1,20,000 करोडपतींच्या स्थलांतराचा आधीचा विक्रम मोडला असणार असल्याचे डॉमिनिक वोलेक हेनले एण्ड पार्टनर्स या संस्थेचे प्रायव्हेट क्लायंटचे ग्रुप हेड डॉमिनिक यांनी सांगितले. जगातील काही भागातील युद्धजन्य परिस्थिती भौगोलिक आणि राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि सामाजिक उलथापालथ त्यामुळे लक्षाधीश मंडळीचे स्थलांतर मोठ्या संख्येने झाले आहे.

दुबई करोडपतींचे आवडते डेस्टीनेशन
जगात स्थलांतर करणाऱ्यां करोडपतींमध्ये दुबईला सर्वांनी अग्र स्थान दिले आहे. त्यासाठी अनेक कारणेही जबाबदार आहेत. दुबईची झिरो इन्कम टॅक्स पॉलिसी, गोल्डन व्हीसा, लक्झरीय लाईफस्टाईलची करोडपती मंडळींना भुरळ न पडली तर नवलच.. मोक्याचे ठिकाण असलेला संयुक्त अरब अमिराती हा देश स्थलांतरीत करोडपतींना सर्वाधिक आकर्षित करीत आहे. या वर्षी एकट्या संयुक्त अरब अमिरातीत 6,700 करोडपतींनी स्थलांतर केल्याचे आकडेवारी संस्थेने दिली आहे. भारतातून करोडपतींनी संयुक्त अरब अमिरातीत बस्तान हलविण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याखालोखाल मिडल ईस्ट रिजन, रशिया आणि आफ्रीका या देशातील लोक युएईला स्थलांतरीत झाले आहेत. अमेरिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीत सर्वाधिक करोडपती यंदा स्थलांतरीत झाले आहेत. अमेरिकेत यंदाच्या वर्षांत 3,800 करोडपती वसणार आहे.

श्रीमंतांची संपत्ती सुरक्षित या देशात
UAE देशाचे संपत्ती व्यवस्थापन इको सिस्टममधील उत्क्रांती आणि विकास अभूतपूर्व असा आहे. पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत संयुक्त अरब अमिरातीने एक मजबूत पर्यटक आणि स्थलांतरीत श्रीमंतांसाठी आखले आहे. त्यामुळे श्रीमंतांना त्यांच्या संपत्तीचे संरक्षण, जतन आणि वाढ करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने उचललेली नाविन्यपूर्ण उपायांमुळे युएई हे श्रीमंतांचे सर्वाधिक आवडते ठिकाण बनल्याचे दुबईतील Hourani येथील प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि फॅमिली ऑफीसच्या पार्टनर सुनीता सिंग-दलाल यांनी सांगितले आहे.

सिंगापूरनंतर कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आवडते देश
सिंगापूर स्थलांतरीतांचे तिसरे सर्वाधिक आवडते ठिकाण बनले असून येथे 3,500 करोडपतींनी यंदा स्थलांतर केले आहे. तर कॅनडा ( 3,200 करोडपती ) आणि ऑस्ट्रेलिया ( 2,500 करोडपती ) हे या यादीत अनुक्रमे 4 थ्या आणि 5 व्या क्रमांकावर आहेत. युरोपातील इटली (+2,200), स्वित्झर्लंड (+1,500),ग्रीस (+1,200) , पोर्तुगाल (+800) आणि जपान (+ 400) या टॉप दहा देशात करोडपतींनी आपला डेरा हलविलेला आहे.

जगातील देशातील श्रीमंती व्यक्तींचे प्रमाण दर्शविणारा तक्ता :

लंडनमध्ये श्रीमंत कमी झाले
टॉप 15 श्रीमंत व्यक्ती असलेल्या देशांच्या क्रमवारीनुसार आपल्या भारतावर राज्य करणाऱ्या, ग्रेट ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची संख्या गेल्या दशकात 8% टक्क्यांनी घसरली आहे . तर इतर देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मात्र वाढ झाली आहे. जर्मनीमध्ये, गेल्या 10 वर्षांत श्रीमंत व्यक्तींच्या प्रमाणात 15% वाढ झाली आहे, फ्रान्समध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या 14% ने वाढली आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये 35%, कॅनडामध्ये 29% आणि यूएसएमध्ये श्रीमंत व्यक्तींच्या प्रमाणात 62% ने वाढ झाली आहे. भारतामध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या साल 2013 ते 2023 दरम्यान चक्क 85 टक्क्यांनी वाढली आहे. आणि भारतातील 80 कोटी जनता गरीब असून त्यांना रेशनिंगवरुन अन्नधान्य मोफत द्यावे लागत आहेत.

श्रीमंत देश देश करोडपती ( USD 1m+) मध्यम करोडपती ( USD 100 m+) अब्जाधीश ( USD 1bn+) 2013 ते 2023 श्रीमंताची वाढ
1 अमेरिका 5,492,400 9,850 788 62%
2 चीन 862,400 2,352 305 92%
10 भारत 326,400 1,044 120 85%
3 जर्मनी 806,100 1,075 82 15%
5 ग्रेट ब्रिटन 602,500 830 75 -8%
6 फ्रान्स 506,000 605 55 14%
9 कॅनडा 371,200 495 52 29%
8 ऑस्ट्रेलीया 383,300 463 48 35%
7 स्वित्झर्लंड 427,700 730 40 38%
4 जपान 754,800 748 39 -6%
11 इटली 289,300 418 38 16%
13 हॉंगकॉंग 143,400 320 35 -4%
12 सिंगापूर 244,800 336 30 64%
15 द .कोरिया 109,600 233 24 28%
14 संयुक्त अरब अमिरात 116,500 308 20 77%

श्रीमंतांना यासाठी पायघड्या
उच्च रहाणीमान आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी परदेशातील या देशांना प्राध्यान्य मिळत आहे. या श्रीमंत व्यक्तीच्या स्थलांतराने संपत्ती आणि प्रतिभेचे फायदे या देशांना मिळत आहेत. तसेच स्थलांतरित कोट्यधीश हे परकीय चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत. कारण ते जेव्हा एखाद्या देशात श्रीमंत व्यक्ती जातात तेव्हा त्यांचा पैसा ते सोबत आणतात. तसेच,या स्थलांतरीत श्रीमंतांपैकी सुमारे 20% उद्योजक आणि विविध कंपन्यांचे संस्थापक आहेत ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि त्यामुळे ते या नवीन देशात स्थानिकांना नोकऱ्या निर्माण करू शकतात असे न्यू वर्ल्ड वेल्थचे संशोधन प्रमुख अँड्र्यू अमोइल्स यांनी म्हटले आहे.

युएस स्टुडंट व्हीसाचे प्रमाण वाढले
अमेरिकेने गेल्यावर्षी अमेरिकेने रेकॉर्डब्रेक 1,40,000 विद्यार्थ्यांना स्टुडण्ट व्हीसा मंजूर केला होता. दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनूसार यंदा गेल्यावर्षी एवढेच किंवा त्याहून अधिक स्टुडण्ट व्हीसा यंदा जारी करणार असल्याचे स्टुडंट व्हीसा डे निमित्त अमेरिकन दुतावासाने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्यांना भारतीयांना फायदा होणार आहे. भारतातील अमेरिकन मिशनने देशभरात 8 वा वार्षिक ‘स्टुडंट व्हीसा डे’ नुकताच साजरा केला. नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईतील दुतावास अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व्हीसासाठी आलेल्या उमेदवारांच्या यावेळी मॅरोथॉन मुलाखती घेतल्या.

गेल्या दहा वर्षात 17 लाख कुटुंबे देश सोडून परदेशात कायमची स्थायिक झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रचारात म्हटले होते. ही सर्व कुटुंबे हिंदू असल्याचाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पाच वर्षांचे सरकार दिले तर आणखी हिंदू कुटुंबांचे देशातून स्थलांतर होईल असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.