भाजपने दिलदारपणा दाखवून पदवीधर ची जागा सोडावी, मनसे कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

0
85

लोकसभा निवडणुकित भाजपला अगदी मनापासून मनसेने साथ दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कुठलीच अपेक्षा न ठेवता ४८ मतदारसंघातून महायुतीसाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. किमान आता कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने या जागेवरचा आग्रह सोडून राजसाहेब ठाकरे यांचा मान राखावा. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा तसेच नंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन दिलदारपणा दाखवावा, अशी आग्रही मागणी राज्यातील मनसे पदाधिकारी तसेच तमाम कार्यकर्त्यांनी केली आहे.

दिल्ली कोणाच्या हातात जाणार याचा निकाल ४ जून रोजी होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हॉट्रिक कऱणार यात शंका नाही मात्र, महाराष्ट्रातून महायुतीला तितकीच तगडे पाठबळ आवश्यक आहे. जनमानसामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मुद्यावर भाजपबद्दल आजही तीव्र नाराजी आहे. विधानसभेत भाजपची परिक्षा होणार आहे. त्यासाठी मनसेची साथ तितकीच गरजेची आहे. अशा परिस्थितीत पदवीधर मतदारसंघातून राज्याच्या राजकारणात ज्ञात असलेले बहुआयामी व्यक्तीमत्व आणि फर्डे वक्ते, मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. आता राजसाहेबांच्या शब्दाचा मान आणि मनसेच्या तमाम कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा विचारात घेऊन भाजपच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, अशी विनंती प्रत्येक जिल्ह्यातील मनसे पदाधिकार्यांकडून सुरू आहे.

शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडाफोडीत भाजप अत्यंत बदनाम झाला. मोदी-शाह आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजीचा सूर लागला. आता अशा परिस्थितीत प्रतिम सावराला भाजपला खूप मोठी संधी आहे. आजवर जी काही बदनामी झाली ती भरून काढण्याची हिच वेळ आहे. स्वतः राजसाहेब ठाकरेंसह मनसेच्या प्रत्येक नेत्याने लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार केला आहे.

बहुआयामी उमेदवार अभिजित पानसे –
अभिजित पानसे यांचे व्यक्तीमत्व या पदवीधर मतदारसंघातून योग्य आहे. राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा हा चेहरा आहे. तमाम कलाकारांचे मोठे पाठबळ पानसे यांच्या मागे आहे. आजच्या युवापिढीचे आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दमदार आवाज असलेला कलाकार, दिग्दर्शक म्हणून रेगे, ठाकरे हे गाजलेले चित्रपट तसेच रानबाजार सारखी बहुचर्चित सिरीयल हे त्यांचे मोठे यश आहे. मनसेचे फर्डा वक्ता, रोखठोक नेतृत्व अशी त्यांची ख्याती आहे. विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात त्यांना संधी मिळाली तर या क्षेत्राला न्याय मिळेल, अशी सर्वांची भूमिका आहे. अभिजित पानसे यांचे पिताश्री जेष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांची ओळख राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून अभिजित पानसे यांनी शालेय विद्यार्थांच्या पाठिवरचे दप्तराचे ओझे कमी कऱण्यासाठी अभिनव प्रयोग केला आणि तो सर्वांना आवडला. म्हणूनच पदवीधर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी अत्यंत महत्वाची आणि यथोयोग्य असल्याने भाजपने दिलदार त्यांच्या उमेदवारीचे समर्थन करावे, असे आवाहन केले आहे.