भाजपने अंधेरीत उमेदवार देऊ नये, राज ठाकरेंच आवाहन…

0
187

मुंबई , दि. १६ (पीसीबी)-  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप आमनेसामने आहेत. या निवडणुकीत आधीच उद्धव ठाकरे यांना सीपीआयसह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रक काढून या निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहेत. तसेच भाजपलाही उमेदवार न देण्याचं आवाहन केलं. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रक काढलं आहे.राज ठाकरे म्हणाले की, मी एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर त्या मतदार संघात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतो. तसे करणे म्हणजे त्या दिवंगत लोकप्रतिनीधीला श्रद्धांजलीच अर्पण करणे अस मी मानतो. त्यामुळे आपणही तसच करावं, अस आवाहन राज ठाकरे यांनी भाजपला केलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय संस्कृतीचं पतन झाल्याची टीका होत आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. अनेक पक्षांनी शिवसेना उमेदावर ऋतुजा लटके यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत उमेदवार देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय संस्कृती अद्याप जिवंत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपलाही उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भात पत्रत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. यावर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठऱणार आहे.दुसरीकडे राज ठाकरे हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जवळ गेल्याच्या चर्चा आहे. भाजपसोबत मनसेची युती होईल, असे अंदाजही बांधले जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरत आहे.