भाजपच्या ३० टक्के आमदारांंना घरचा रस्ता, ११० जागांवर उमेदवार निश्चित, शुक्रवारी पहिला यादी

0
3

नवी दिल्ली, दि. 17 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती असून 30 टक्के उमेदवारही बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. तसेच येत्या शुक्रवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती. त्यामध्ये भाजपच्या 105 मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर 11 आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे.

या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतले. देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी राहिले. बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजप मुख्यालयात पोहचले.

भाजपकडून 110 जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 30 टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीतील नेते मित्रपक्षांशी चर्चा करणार
भाजपचे बहुतांश उमेदवार ठरल्यानंतर आता राज्यातील भाजपच्या नेत्यांची चर्चा संपली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ज्या जागांवर वाद आहे त्या जागांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे.