दि. ११ (पीसीबी) – आपण रोज आपल्या कामासाठी, व्यायामासाठी किंवा काही ना कामासाठी रस्त्यावर चालत जातो. वाहनाने प्रवास करतो. मात्र रस्त्यावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे कधी कधी नागरिकांचा अपघाती किंवा कुत्रा चावल्याने मृत्यू देखील होतो. सध्या दिल्ली अशीच स्थिती निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास दिल्लीतील नागरिकांना होतो आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला अत्यंत स्प्ष्ट असे आदेश दिले आहेत. दरम्यान, हा आदेश संपूर्ण देशभरासाठी लागू आहे, असाही निष्कर्ष काढण्यात आल्याने भटक्या कुत्र्यांमुळे त्रासलेल्या जनतेने सुस्कारा सोडला आहे.
सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महत्वाचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.
ज्या नागरिकांना रेबीज झाला त्यांना परत आणता येईल का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. भटक्या कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. त्वरित या सर्व भटक्या कुत्र्यांना पडकून शेल्टर होममध्ये पाठवावे, असे या आदेशात म्हटले आहे. जवळपास ५००० कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याची आवश्यकता असल्याचे कोर्ट म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाची पायमल्ली जाणाऱ्या म्हणजेच, या कारवाईत कोणी अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.