उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, न्यायालयाच्या निकालाचं सर्वांनी स्वागत केलेले आहे. पण, न्याय मिळताना उशीर झालेला आहे. देर आये दुरुस्त आये. त्यावेळी देशात युपीएचे सरकार होते आणि मोठ्या प्रमाणावर बॉम्ब ब्लास्ट होत होते. त्यावेळेस यूपीए सरकारचं म्हणणं होतं की, दहशतवादाला कुठला रंग नसतो. परंतु, मालेगावचा स्फोट झाला, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की, हा भगवा दहशतवाद आहे. राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या निकालामुळे त्यावेळेस केलेल्या राजकारणाला कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, भगवा दहशतवाद म्हणून हिंदुत्वाला त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू सहिष्णु असतो, देशाच्या विरोधातील कारवाया तो कधीच करत नाही. आजच्या निकालावरून हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.