बदलापूर घटनेत जर आरोपीचं नाव अकबर शेख, खान असतं तर? – सुषमा अंधारे

0
40

दि. २० ऑगस्ट (पीसीबी )बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एका नामांकित शाळेत घडला. या शाळेबाहेर आणि रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. बदलापूरमध्ये जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. आता यावरुन राजकीय आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ही शाळा भाजपाच्या लोकांशी संबंधित आहे असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.

नेमकी घटना काय घडली?
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या दोन्ही मुली अत्यंत कोवळ्या वयातल्या आहेत. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर मंगळवारी रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणात आता सुषमा अंधारे म्हणाल्या की जर आरोपीचं नाव अकबर शेख, खान असतं तर?

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“देवेंद्र फडणवीस हे मागच्या दहा वर्षांमध्ये साडेसात वर्षे गृहमंत्री आहेत. ज्या पालकांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हा दाखल करता? तो वामन म्हात्रे महिला पत्रकारावर घाणेरडी कमेंट करतो, त्याला माफ करता? अपेक्षा करता की लोकांनी शांत बसावं?” असे प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारले आहेत.

अक्षय शिंदेच्या जागी अकबर खान, शेख असता तर..
“अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे, तुम्ही जात, धर्म पक्ष बघून व्यक्त होता” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. “बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता, तर लोक रस्त्यावर का आली असती? पोलीस कमिशनर डुमरेंना प्रकरण नीट हाताळता आलं नाही. लोक का संतप्त झाले? आशुतोष डुमरेंचं काय करणार ?” असे प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं असा आरोप केला आहे.