दि.२०(पीसीबी)-नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अशोक खरातचे कारनामे आता समोर येत असून धक्कादायक माहिती समोर येण्यासोबत गंभीर आरोप देखील होऊ लागले आहेत. अशोक खरात हा प्रसादामध्ये कफ सिरपमध्ये व्हायग्रा मिसळून देत असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, ” अशोक खरातला केवळ ‘भोंदू’ म्हणू नका, तो एक ‘विकृत’ माणूस आहे ज्याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दमानिया यांनी खरातच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. “खरात हा कफ सिरपमध्ये ‘व्हायग्रा’ मिसळून ‘ओशनो जल’ तयार करायचा. हे जल घेण्यासाठी अनेक बडे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे. यामध्ये तिरुपती मंदिराचे ट्रस्टी आणि मुंबईतील एका बड्या डेप्युटी कलेक्टरचाही समावेश आहे,” असा दावा त्यांनी केला. श्रीमंत लोकांना पैशांसाठी लुटले जायचे, तर मध्यमवर्गीय महिलांचे लैंगिक शोषण केले जायचे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.









































