प्रशासनाच्या उदासीनतेने आयुक्तांची गाडी फोडण्याची आली वेळ : बाबा कांबळे

0
27

– अंध, अपंग, टपरीधारकांच्या प्रश्नाच्या गांभीर्याकडे बाबा कांबळे यांनी लक्ष वेधले

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : प्रशासनाच्या राजकीय उदासीनतेचा फटका सर्वसामान्य गोरगरीब, अंध, अपंग, टपरीधारक कष्टकरी यांना बसत आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न शासन दरबारी रखडलेले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न सुटले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून पिंपरी येथे आयुक्तांची गाडी फोडून अंध, अपंग, बांधवांनी आपला संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा अंध, अपंग टपरी पथारी हातगाडी धरक, रिक्षा चालक कष्टकरी साफसफाई महिला च्या संतापाला सामोरे जावे लागेल असा इशारा बाबा कांबळे यांनी आयुक्तांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केली की, पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात पूर्णपणे कुचकामी ठरले आहे. नागरिकांच्या जीवन मरणाशी निगडित व दैनंदिन कामे सोडण्यासाठी प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे. शहरातील टपरी, पथारी, हातगाडीधारक, फळ विक्रेते साफसफाई, कामगार, महिला, धुणी भांडी काम करणाऱ्या महिला कागद काच पत्रा, महिला, रिक्षा चालक अशा गोरगरीब कष्टकरी घटकांचे प्रश्न प्राधान्य सोडवावेत, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

शहरातील गोरगरीब कष्टकरांचे प्रश्न अत्यंत बिकट झाले आहेत. प्रशासन मात्र नुसते कागदी घोडे नाचवत आहे. शून्य कचरा, आधुनिक पद्धतीने रस्त्यांचे साफसफाई या योजना केवळ कागदावर आहेत. यामुळे हजारो महिलांचे काम गेले आहे, यासह फेरीवाल्यांचे धोरण निश्चित नाही. रिक्षांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे परंतु त्यांना रिक्षा स्टॅन्ड नाही त्यांच्यावर होणारे सततची ऑनलाईन कारवाई मुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत, रखडलेले प्रश्न यामुळे कष्टकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोणतीही ठोस भूमिका घेऊन गोरगरीब, कष्टकरांचे प्रश्न सोडविले जात नाहीत. ठेकेदारांचे हित जोपासले जात आहे. भांडवलदारांना पुरक धोरण राबविले जात आहे. ठेकेदारांना पोसण्याचे काम महापालिका करत आहे. यामुळे गोरगरीब कष्टकरांमध्ये असंतोष पसरत आहे.

अन्यथा वाईट परिणाम होतील…

पिंपरी झेंडावंदन प्रसंगी घडलेल्या घटनेचा विचार करून वेळीच सावध न झाल्यास याचे पुढील काळामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात, असा गर्भित इशारा बाबा कांबळे यांनी दिला. यातून महापालिकेचे आयुक्त तसेच शहरातील खासदार, आमदार, राजकीय लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे पदाधिकारी यांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.

गरीब, श्रीमंत दरी नको –

स्वतंत्र्याचे झाले काय आमच्या हाती आले काय हा प्रश्न घेऊन शहरातील टपरी, पथारी, हातगाडी धारकांनी पिंपरी चिंचवड महापालिके वर नुकतेच आंदोलन केले. हा प्रश्न अनेकांना चेष्टेचा वाटला. परिणामी अंध, अपंगांनी आयुक्तांची गाडी फोडली या प्रश्नाचे गांभीर्य किती आहे हे अधोरेखित केले आहे. अकोला, कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शेतमजूर कष्टकऱ्यांनी अनेक प्रश्नांवर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब देखील अत्यंत गंभीर आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असे प्रकार समोर येणे हे अत्यंत घातक आहे. सरकारचे धोरण चुकीच्या दिशेने जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. ही दरी समाजात विषमता पसरवत असून हे थांबले पाहिजे, असे बाबा कांबळे म्हणाले