प्रशासकांच्या ‘जनसंवाद’ सभेकडे नागरिकांची पाठ

0
256

पिंपरी,दि ११( पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज (सोमवारी) आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या सतराव्या जनसंवाद सभेत केवळ 54 नागरिकांनी सहभाग घेतला. दरम्यान, मागील दोन आठवड्यापासून प्रशासकांच्या जनसंवाद सभेकडे नागरिक पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 6, 5, 4, 8, 10, 2, 13 आणि 6 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अभिजित हराळे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. त्यामध्ये पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, नागरिक रस्त्याच्या बाजूला कचरा टाकत आहेत त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. अशा नागरिकांना दंड करून शिस्त लावण्यात यावी. ड्रेनेज लाईनची कामे करावी, अनधिकृत पत्राशेड हटवावे, अनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकतधारकांवर कारवाई करावी, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने पदपथ आणि दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवावी, रस्ता रुंदीकरण करावे, सुलभ शौचालयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करावा, रोडवरील पार्किंग ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली वाहने हटवावीत अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.