दि.०७(पीसीबी)-रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर आले होते. पुतिन यांच्या या दौऱ्याकडे अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियादरम्यान अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचा टॅरिफ दबाव झुगारून भारतानं रशियासोबत अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र त्यानंतर आता पुतिन यांनी भारत दौऱ्यावर असातना मोठी घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरं पहाता हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पुतिन यांच्या या भारत दौऱ्याचे हादरे आता अमेरिकेत बसल्याचं दिसून येत आहे. पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला होता.
अमेरिकेकडून आपली नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी (NSS) जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये चीन हा अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असल्याचं म्हटलं आहे तर भारताचा समावेश हा महत्त्वाच्या भागीदार देशांमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर आता पुतिन भारतातून परतल्यानंतर अमेरिकेमधून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे. येत्या दहा डिसेंबरपासून नवी दिल्लीमध्ये या चर्चेला सुरुवात होणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा करार पूर्ण होऊ शकतो अशी भारताला अपेक्षा आहे.
या करारामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. या कराराच्या माध्यमातून येत्या 2030 पर्यंत भारत आणि अमेरिकेतील व्यापार 191 अरब डॉलरवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.










































