पुणे बाजार समिती निवडणूक, राष्ट्रवादीतच बेबनाव

0
418

पुणे, दि. २५ (पीसीबी) – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर असून प्रचारात सर्वच पॅनल आघाडीवर असले तरी आतबट्ट्याच्या सक्रीय प्रचारात मात्र बहुतांश उमेदवारांची फाटाफूट पडल्याचे दिसून येत आहे. काही पॅनलमध्ये केवळ खर्च करण्यासाठी बळीचा बकरा बनविण्याच्या उद्देशाने उमेदवारी दिल्याचे अंधारातील सक्रीय प्रचारातून उघड होत आहे. राष्ट्रवादीत फाटाफूट पडून काही बंडखोरांनी प्रतिस्पर्धी पॅनलच्या प्रमुखांसोबत हातमिळवणी केल्याने अधिकृत पॅनलमधील उमेदवारांची फसगत होत आहे. राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलच्या जाहीर 18 पैकी 15 जागांवरील उमेदवारांमध्ये नानासाहेब आबनावे, सरला चांदेरे, सचिन घुले यांना मतदारांची सर्वाधिक पसंती मिळत असून 4 जागांवरील उमेदवार मात्र धोक्यात असल्याचे मतदारांच्या कल जाणून घेतल्यावर दिसून येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत गटातील 1 व सेवा सहकारी मतदारसंघातील गटातील 3 जागांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे बंडखोर भाजपसोबत छुपे गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केला आहे मात्र कारवाई निकालानंतर करण्यात येईल असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीतच बेबनाव असल्याची चर्चा मतदारांमध्ये घडवून आणली जात आहे त्याचा थेट परिणाम मतदानावर होणार असल्याने बंडखोरांना उत्तेजन मिळत आहे. सेवा सहकारी मतदारसंघातील गटातील ग्रामपंचायत गटातील 4 जागांसाठी 11 उमेदवारांमध्ये लढत होत असून एकूण 713 मतदारांच्या हातात त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सर्वसाधारण गटातून दोन जागांसाठी सहा उमेदवार, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी तीन उमेदवार, आर्थिक दुर्बल गटातून एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे असले तरीही विरोधी पक्षांना व बंडखोरांच्या गळाला देखील अनेक मतदार लागले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलची 1 जागा पूर्णतः गमावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे उर्वरीत 3 दिवसांमध्ये दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. तर सेवा सहकारी मतदारसंघातील 11 जागांसाठी 29 उमेदवारांमध्ये लढत होत असून एकूण 1918 मतदारांच्या हातात त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. यामध्ये अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीचे 3 उमेदवारांकडे मतदारांचा कल दिसून येत आहे.

सेवा सहकारी मतदारसंघातील 11 जागांमध्ये सर्वसाधारण गटातून सात जागांसाठी २१ उमेदवार आणि महिला राखीव गटातून दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागासवर्ग गटातून एका जागेसाठी दोन उमेदवार, विमुक्त भटक्या प्रवर्गातून एक जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीचे चिन्ह कपबशी असून त्यांच्यामध्ये देखील आदळआपट दिसून येत आहे. इतर मागासवर्ग गटातील उमेदवाराला केवळ खर्चाचा धनी म्हणून आघाडीत घेतले असल्याचे बहुतांश मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत तर राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे चिन्ह छत्री असून प्रचारात छत्री कल्पकतेने वापर केला जात असला तरी गावकी-भावकी व एकमेकांचे परस्परांशी नातेवाईकांच्या संबंधाने आर्थिकदृष्ट्या देवाणघेवाणीमध्ये अडचणीचे ठरत आहे. त्याचा विपरीत परिणाम सक्रीय पसंतीच्या मतदानावर होत असल्याच्या देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

व्यापारी, आडते गटात सर्वाधिक मतदार असून, या गटातील निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी दोन पॅनल समोरासमोर असून, व्यापारी गटातील पॅनलने कोणालाही पाठिंबा दिला नाही. या गटातील प्रत्येकी दोन उमेदवारांनी पॅनल तयार केला आहे. व्यापारी-अडते गटातील 2 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असून हमाल-तोलणार गटातील एका जागेसाठी 5 उमेदवार लढत देत आहेत. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत गटांत राजकीय पक्षांच्या वतीने पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. तर, कोणत्याही पक्षाकडून त्यांच्या पॅनेलमध्ये आडते, व्यापारी गटात उमेदवार देण्यात आलेला नाही. तरीही एका पॅनेलच्या दोन उमेदवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न सफल झाला नसल्याची चर्चा होत आहे. हमाल पंचायतीसह इतर समितीच्या सलंग्न संघटनांच्या उमेदवारांनीही बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीमध्ये प्रथमच सर्वपक्षीय पॅनेलमधून आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान असल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

बाजार समितीची निवडणूकीसाठी मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. 18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत. सेवा सहकारी संस्था गटातून सर्वाधिक 11 उमेदवार निवडून येणार आहेत. ग्रामपंचायत गटातून चारजण, व्यापारी-आडते गटातून दोनजण आणि हमाल, मापाडी गटातून एक उमेदवार निवडून येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश जगताप काम पाहत आहेत.