दि.१०(पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित अशा एकूण ७५४ ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासकीय पातळीवर अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या सर्व ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला असून, तो संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रभाग रचना तयार केली आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण आणि प्रभागांच्या चतु:सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना या आराखड्यावर काही हरकती किंवा सूचना नोंदवायच्या असल्यास, त्या विशिष्ट कालावधीत तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकतींची पडताळणी केल्यानंतरच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.
जुलै ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार यादी अद्ययावत करणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यामुळे आता गावपातळीवर पॅनेल तयार करणे आणि आरक्षणाचे गणिते मांडण्यास इच्छुकांनी सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील या मोठ्या टप्प्यातील निवडणुकांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.













































