नवी दिल्ली, दि. ५ : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन्ही देशाच्या सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे. त्यातच, पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 4 वाजता पाकिस्तानात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. एकीकडे भारताकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण शांतता असताना निसर्गानेच आता पाकिस्तानला धक्का दिलाय.
4.2 तीव्रतेचा भूकंप हा सौम्य (mild) श्रेणीत मोडतो, ज्यामुळे सामान्यतः मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ धक्के (tremors) जाणवू शकतात, परंतु जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. अद्याप या भूकंपामुळे कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. दरम्यान, यापूर्वी, 30 एप्रिल 2025 ला 4.4 तीव्रतेचा आणि 12 एप्रिल 2025 ला 5.8 तीव्रतेचा भूकंप पाकिस्तानात झाला होता, ज्यामुळे काही ठिकाणी धक्के जाणवले होते.