पंतप्रधान मोदी येतात, रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? संजय राऊतांची जहरी टीका

0
4

मुंबई, दि. २० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यात पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊतांनी नुकतंच मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि जातात. आपण नक्की कसलं उद्धाटन केलंय हे देखील त्यांना माहिती नसतं, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. खरंतर या राज्याच्या संदर्भात भाजप डळमळीत आणि अस्थिर झाला आहे. औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. त्याचं सर्वस्वी कारण म्हणजे नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात. उद्योगाचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

आजही एक मोठा उद्योग गुजरातला नेला आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. नरेंद्र मोदींनी उद्धाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातला नेताय, ते महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही प्रयत्न करा. मोदी काश्मीरला गेले. पूर्ण राज्याचा दर्जा देणार असं म्हटलं आहे. का म्हटलं तर तिथल्या लोकांचा संताप आहे. मग तेव्हा तुम्ही पूर्ण राज्याचा दौरा तुम्ही का काढला. त्याचप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातील जे काही उद्योग गुजरातला नेला आहात, ते पुन्हा महाराष्ट्राला द्या, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. यावेळी ते राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होतील. यानतंर मोदी हे पीएम विश्वकर्मांच्या लाभार्थ्यांना किट वाटप करतील. या कार्यक्रमाला १५ हजार विश्वकर्मा, ५ हजार IT प्रशिक्षणार्थी, २० हजार महिला बचत गटाच्या महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील पीएम मित्र टेक्सटाईल पार्क आणि अॅरेल पार्कची पायाभरणी करणार आहेत. त्यासोबतच या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यांच्या नावे एक टपाल तिकीट जारी केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही यावेळी केला जाणार आहे.