निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये – अजित पवार

0
87
  • कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही…
  • ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ ही भूमिका घेतल्याने आपल्याला अपेक्षित असलेले यश निश्चितपणे मिळेल – सुनिल तटकरे

मुंबई – निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक गरवारे क्लब हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
अजितदादा पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी मनोधैर्य वाढवले. येत्या विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवविले जातील, असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुती सरकारच्या काळात घेतले आहेत. शिव – फुले – शाहू – आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, अशी भूमिका अजितदादा पवार यांनी स्पष्ट केली.

येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देशभरात करायचा असल्याचा निर्धार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यावर महाराष्ट्राची जनता १०० टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली. मात्र, प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणाविषयी टीकाटिप्पणी करताना मर्यादा ओलांडली नाही, याचा सुनिल तटकरे यांनी आवर्जून उल्लेख करतानाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार आहोत याचा अभिमान असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

येत्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे त्यादृष्टीने आपल्याला आता संघटनात्मक बांधणी करायची आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ ही भूमिका घेऊन आजपासून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन करतानाच आपल्याला अपेक्षित असलेले यश निश्चितपणे मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

पावसाळी अधिवेशनापूर्वी जिल्हास्तरावर विभागीय मेळावे घेणार असल्याचे सांगतानाच दिनांक १० जून रोजी पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून त्यादृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर द्यावा आणि सर्वांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, धाराशिव लोकसभेच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आमदार प्रकाश सोळंके, आमदार दिलीप मोहिते, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार बबनराव शिंदे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार शेखर निकम, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार विक्रम काळे, आमदार सुनिल शेळके, आमदार मकरंद आबा पाटील, आमदार दिपक चव्हाण, आमदार देवेंद्र भुयार, आमदार चेतन तुपे, आमदार यशवंत माने, आमदार नितिन पवार, आमदार अण्णा बनसोडे, आमदार राजेश पाटील, आमदार किरण लहामटे, आमदार राजू कारेमोरे, आमदार दौलत दरोडा, आमदार राजू नवघरे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार रमेश थोरात, मुश्ताक अंतुले, विलास लांडे, आमदार अनिकेत तटकरे, आनंद ठाकूर, दिपक आबा साळुंखे, कैलास पाटील, माजी आमदार पंकज भुजबळ, अरविंद चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राजलक्ष्मी भोसले, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रवक्ते आनंद परांजपे, अल्पसंख्याक सेलचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनील मगरे आणि सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.