विधानसभेच्या एका जागेसाठी भाजपाचे ८४ आमदार १४ खासदार प्रचाराच्या मैदानात

0
212

हैद्राबाद, दि. १२ (पीसीबी) – तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी त्यांच्या पक्षाच्या नावात बदल केला आहे. त्यांनी तेलंगाणा राष्ट्र समिती हे नाव बदलून आपल्या पक्षाला भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) असे नवे नाव दिले आहे. राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नाव बदलून अवघे काही दिवस झालेले असतानाच आता या पक्षाने नालगोंडा जिल्ह्यातील मुनुगोडे या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी आपले तब्बल ८४ आमदार आणि १४ खासदार प्रचारासाठी मैदानात उतवरवले आहेत.

बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी कोणत्याही परीस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चय केला आहे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या पक्षाचे ८४ आमदार आणि १८ खासदार प्रचारासाठी मैदानात उतरवले आहेत. मुनुगोडे या जागेसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तेलंगाणा राज्यात आगामी वर्षात म्हणजेच २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळेदेखील या पोटनिवडणुकीला महत्त्व आले आहे. दुसरीकडे भाजपानेही ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, असे सांगत ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत विजय संपादन करून पक्षाचे नाव बदलण्याचा तसेच राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचा आपला निर्णय येथील स्वीकारला आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केसीआर यांच्याकडून केला जात आहे.

ऑगस्ट महिन्यातील २ तारखेला काँग्रेसचे नेते कोमतीरेड्डी राजगोपाल रेड्डी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेलंगाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत २१ ऑगस्ट रोजी त्यांनी भाजपात प्रवेश केला. याच कारणामुळे मुनुगोडे या मतदारसंघासाठी आता पोटनिवडणूक होत आहे. या जगेसाठी रेड्डी हेच भाजपाचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपाने केलेली आहे. आता वरवर भाजपा-काँग्रेस-बीआरएस या तीन पक्षांमध्ये या पोटनिवडणुकीसाठी लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मुख्य लढत ही भाजपा विरुद्ध बीआरएस यांच्यात होणार आहे, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.