धर्म मानणाऱ्या भारताने जगात कुणाचाही फायदा उचलला नाही – मोहन भागवत

0
170

गुजरात, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक काल (रविवारी) केले, ते गुजरात मधील बनासकाठा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चीन, अमेरिका, रशिया आदी देशासह अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याठिकाणी वेद संस्कृत ज्ञान गौरव समारंभाचे आयोजन केले होते.

“आज जेव्हा केव्हा देशांत युद्ध होते तेव्हा भारत म्हणतो, लढाईचा काळ नाही, युद्ध बंद करा. असे सांगण्याचे धाडस आधी नव्हते. श्रीलंका चीनशी मैत्री करत होता. आपल्याला दूर ठेवत होता. मात्र, संकटात सापडल्यावर एकच देश समोर आला तो म्हणजे भारत. कारण, धर्म मानणाऱ्यांचा देश जगात कुणाचाही फायदा उचलत नाही,” असे मोहन भागवत म्हणाले.

“बलवान होऊन मोठे देश काय करतात, लाठी चालवतात. प्रथम रशियाने चालवली होती. त्याला अमेरिकेने पाडले. त्यांनी आपली लाठी चालवायला सुरुवात केली. आता चीन आला आहे. तो अमेरिकेला मागे टाकेल,” असे मोहन भागवत म्हणाले.

“युक्रेनला मोहरा बनवून अमेरिका आणि रशिया लढत आहेत. आम्हाला सांगताहेत की,त्यांना पाठिंबा द्यावा. मात्र, आम्ही स्पष्ट केले की, तुम्ही दोघेही आमचे मित्र आहात आणि तुम्हा दोघांमध्ये जे मरत आहेत,त्यांचेही आम्ही मित्र आहोत. त्यामुळे आधी युद्ध बंद करा, अशी सूचना मोहन भागवत यांनी यावेळी केली.