चंद्रपूर, बीड, मुंबई, भिवंडी, पुण्यासह पिंपरी चिंचवड मधील प्रश्न विधिमंडळात मांडले – आ. उमाताई खापरे
पिंपरी, दि.२० पिंपरी चिंचवड शहरातील पवित्र इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रात काही विकसक भराव टाकून जमीन तयार करून तेथे अनधिकृत बांधकामे करत आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन प्रदूषण व पर्यावरण संतुलनाचा गंभीर प्रश्न होत आहे. येथे नदी सुधार प्रकल्प राबवून या नद्या पर्यावरण मुक्त करण्यासाठी शासन काय प्रयत्न करीत आहे. तसेच केडगाव, तालुका दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये दाखल झालेल्या अनाथ मुलींवर तसेच अशा इतर संस्थांमध्ये ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मुलींवर अत्याचार केले जातात त्यांची मान्यता रद्द करणार का असा प्रश्न देखील पुन्हा एकदा आमदार उमाताई खापरे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात विचारला होता. तसेच भिवंडी मध्ये असणाऱ्या गोदामांना वारंवार आग लागण्याच्या दुर्घटना घडतात याबाबत शासनाचे धोरण काय असाही प्रश्न आ. उमा खापरे यांनी विचारला होता.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, सरसकट सर्व संस्थांवर कारवाई करता येणार नाही. परंतु तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल तसेच पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांकडून एक महिन्यात अहवाल घेऊन संस्थादोषी असल्यास मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल. भिवंडी येथील गोदामांविषयी फडणवीस यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या जागेमध्ये उद्योग विभागाच्या वतीने लॉजिस्टिक पार्क उभारले जाईल त्या ठिकाणी सेवा सुविधा देऊन गोदामे स्थलांतरित करण्यात येतील.
तसेच चंद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोळसा खाण, सिमेंट, स्टील उद्योग व औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे येथील परिसरात प्रदूषणात वाढ झाली असून नागरिकांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. अक्कापुर एमआयडीसी येथे उद्योग सुरू करण्यासाठी ज्या उद्योजकांनी जागा घेतल्या आहेत परंतु अद्यापही प्रकल्प सुरू केले नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार. तसेच बीड जिल्ह्यातील अनेक महिलांचे विनाकारण गर्भाशय काढण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सरकारी शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत आहे. आदिवासी भागामध्ये माता व नवजात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रकल्पांच्या जागेमध्ये असणारी झाडे तोडल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करावे, आदिवासी भागात रुग्णांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्याव्यात. झोमॅटो स्विगी सारख्या कंपन्यांकडून घरपोच खाद्यपदार्थ व इतर वस्तू देण्याची सेवा दिली जाते परंतु यामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी तसेच अशा काही फ्रॉड कंपन्यांकडून होणारी नागरिकांची फसवणूक कशी रोखणार असे राज्यस्तरावरील प्रश्न आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत उपस्थित केले.
तसेच पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे, पिंपरीत असणारे अण्णासाहेब मगर स्टेडियमला निधी उपलब्ध करून द्यावा, मिलिंद नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये दुबार घरे दिली गेली आहेत. त्याची चौकशी करावी. पिंपरी चिंचवड विकास आराखडा रद्द करावा अनेक ठिकाणी नागरिकांच्या अधिकृत घरांवर आरक्षण टाकण्यात आले आहे तसेच बोपखेल मध्ये एक किलोमीटरच्या परिघात शाळा असताना देखील खाजगी जागेवर शाळेचे आरक्षण टाकण्यात आले आहे ते रद्द करावे असे पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित प्रश्न देखील उमा खापरे यांनी सभागृहात उपस्थित केले. शासकीय सेवेतील खेळाडूंना क्रीडा क्षेत्राची जबाबदारी द्यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सवलती देऊन गोशाळेत भाकड गाईंचे संगोपन करणाऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. तसेच लाडक्या बहिणी योजनेसाठी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी २६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील आमदार उमा खापरे यांनी मानले.
उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री उदय सामंत, पंकजा मुंडे, दादा भुसे, माधुरीताई मिसाळ, नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रकाश आबिटकर तसेच डॉ. पंकज भोयर या मंत्र्यांनी उत्तरे दिली.