दि . ५ ( पीसीबी ) – महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणा पेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय, कोण रेडा कापतोय. माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
तर सरकार कशाला पाडलं?
महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते, त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आपल्या हक्कांची आहे, लढलो आणि आपण घेतली. काश्मीरमध्ये 370 कलम हटवायला आपण पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते, एक निशाण एक झेंडा. हिंदी सक्ती आम्ही लावून घेत नसतो. उद्धव ठाकरे यांनी निर्णय आणला म्हणतात. मी एवढं काम करत होतो तर सरकार कशाला पाडलं? महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर तो भेडिया बोलतोय. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला, असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली.