देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या सोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान

0
322

राजगुरुनगर, दि. २४ (पीसीबी) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या सोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान आहे. मात्र, आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असेही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास नवी पिढी शिकत नसल्याची खंतही राज्यपालांनी व्यक्त केली.

राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 वी जयंती सोहळ्यानीमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली. राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांनी राज्यपालांना चांगलेच चिमटे काढले. यावेळी आत्ताचे सरकार राज्यपालांचे ऐकणारे सरकार आहे, असे सांगत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपालांना टोला लगावला. त्यातच अमोल कोल्हे यांनीही उडी घेत काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुरुबद्दल केलेल्य वादग्रस्त विधानाला छेडत ठणकावून सांगितले की छत्रपतींचे गुरू हे त्यांचे आई व वडीलच होते. तसेच देशासाठी क्रांतिकारकांच्या बलिदानाची आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार रुजवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत क्रांतिकारकांचा इतिहास सांगावा लागेल.

राज्यापाल बोलायला उठल्यानंतर त्यांनी चांगलेच टोले लगावले. राज्यपाल म्हणाले, आमदारच हा कामदार असतो आणि राज्यपाल नामधारी असतो, असे प्रत्युत्तर दिलीप मोहिते यांना दिले. राज्यपालांच्या विधानाने उपस्थितांतमध्ये चांगलीच खसखस पिकली. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या सोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान आहे. मात्र, आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असेही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास नवी पिढी शिकत नसल्याची खंतही यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली.

देशाच्या स्वातंत्र्यसाठी अनेकांनी बलिदान दिले संपत्ती दिली. मात्र, हल्ली देशप्रेम कमी होत चालले आहे. देश आहे तर आपण आहे हे सांगायला राज्यपाल विसरले नाहीत. सध्या फक्त पैसा आणि सत्ता यासाठी सर्व राजकारणी आणि जनता काम करत असल्याचे दिसते आहे. यामुळेच काही राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असल्याचेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळाले विकास झाला. मात्र, विकास होत असताना कामाच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त करत राज्यपालांनी खड्डे असलेल्या रस्त्यांचे उदाहरण दिले. आधी खड्डा बनतो मग रस्ता होतो, त्यासाठी नागरिकांनीच यापुढे क्रांतिकारक बनायला हवे असे आवाहन केले.

देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृत ठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीत राष्ट्रप्रेम वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, हुतात्मा सुखदेव यांचे वंशज अनुज थापर, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज रवींद्र पिंगळे, हुतात्मा भगतसिंग यांचे वंशज किरणजीत सिंग, हुतात्मा बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद यांचा गौरव करण्यात आला.