दीड वर्षांत पिंपरी चिंचवड शहरात ३० वैष्णवींचा अंत

0
3

– पावणे तीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर दाखल केले गुन्हे

पिंपरी, दि. २४ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतीच हकालपट्टी झालेले नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असताना, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दीड वर्षांत ३० विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याच कालावधीत पावणे तीनशे विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देण्याचे आरोप करत पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. जानेवारी २०२४ पासून ते मे २०२५ या कालावधीत या घटना घडल्या असून, त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिली आहेत.

या आत्महत्यांमागे मानसिक छळ, हुंड्याची मागणी, पतीचे व्यसनाधीन वर्तन, कौटुंबिक कलह, संशयाचे वातावरण, आर्थिक अडचणी, सासरच्या मंडळींचा अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये विवाहित महिलांवर मातृत्वाचा दबाव, मुल नसल्यामुळे होणारा ताण, सतत अपमानित करण्यात येणं, आणि पतीच्या परस्त्री संबंधांचा त्रासही आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे.

बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांच्या मृत्यूनंतर संबंधित सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. काही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीतही ठेवण्यात आले. मात्र काही दिवसांतच हे आरोपी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर संबंधित महिलांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे न्यायासाठी कोर्ट-कचेऱ्यांचे उंबरे झिजवत आहेत. अनेक वेळा आर्थिक मर्यादा, सामाजिक दबाव, आणि कायदेशीर प्रक्रियेची गुंतागुंत ही अडचणी न्यायाच्या मार्गात अडसर ठरत आहेत.

आळंदी येथील प्रियांका उमरगेकर या विवाहितेने २०२२ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या लग्नात आलिशान कार दिली होती, मात्र त्यानंतरही सासरकडील मंडळींकडून सतत अधिक हुंड्याची मागणी होत होती. शेवटी तिने आयुष्य संपवले. पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या अन्य सदस्यांना अटक केली, मात्र ते काही दिवसांतच जामिनावर बाहेर आले. तिचे वडील म्हणतात, “पोलीस अटक करून मोकळे झाले, आम्ही मात्र न्यायासाठी अजूनही झगडतो आहोत.”

वैष्णवी हगवणे आत्महत्येचे प्रकरण चर्चेत आले कारण ती एका राजकीय नेत्याची सून होती. त्यामुळे या प्रकरणाला प्रसारमाध्यमांत, राजकीय क्षेत्रात आणि समाजात मोठी दखल मिळाली. पोलीस कोठडी, पत्रकार परिषद, आंदोलने, राजकीय वक्तव्ये यामुळे प्रकरण वेगवेगळ्या टप्प्यांवर चर्चेचा विषय बनले. मात्र अशाच स्वरूपाची अन्य अनेक प्रकरणे दुर्लक्षित असल्याने खंत व्यक्त होत आहे.

आत्महत्या टाळण्यासाठी उपाय :
विवाहित महिलांनी अशा प्रसंगी तात्काळ मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच सरकारी ‘महिला तक्रार निवारण केंद्र’, महिला आयोग, आणि स्वयंसेवी संस्थांचा आधार घ्यावा. पोलिसांकडे वेळेत तक्रार दाखल करणे, साक्षीदार गोळा करणे आणि कायदेशीर प्रक्रिया राबविणे यासाठी प्रशिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक वादांमध्ये मध्यस्थी आणि समुपदेशन केंद्रांची मदत घेणे हेही महत्त्वाचे ठरू शकते.

महिलांवरील छळाच्या घटनांकडे ‘हे तर घराघरात होते’ या मानसिकतेने न पाहता, संवेदनशीलपणे आणि तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक आहे. केवळ मृत्यूनंतर नव्हे, तर छळ सुरू असतानाच योग्य मदतीसाठी पुढे येणे ही सामाजिक जबाबदारी आहे. या घटनांकडे केवळ पोलिस आणि न्यायालयांची बाब न समजता सर्वांनी जबाबदारी घेतली तर अशा वैष्णविंचे जीवन वाचवता येणे शक्य आहे, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी म्हटले आहे.