त्या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
4

दि.०८(पीसीबी)-राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मुंढवा-कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप गेली दोन दिवसांपासून होत होता. त्या आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. दरम्यान आज, उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क येथील जमीन अनियमितता प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे वडील अजित पवारांनी व्यवहारासंदर्भात माहिती दिली. माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. आता, याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती संपूर्ण चौकशी करेल, त्या चौकशीत सर्व घटनाक्रम पुढे येईल. कोणी मदत केली, कुणाचे फोन गेले हे सगळं समोर येईल. मात्र, मी नेहमीच माझ्या स्व‍कीयांना, नातेवाईकांनाही सांगतो, नियमाच्या बाहेर जाऊन केलेलं मला चालणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मी आजपर्यंतच्या राजकीय जीवनात नियम तोडून काम केलेलं नाही. मागे माझ्यावर २००९-१० ला आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाहीत. त्याच्यात अनियमितता होती, श्वेतपत्रिका काढली हे आपल्याला ज्ञात आहे. अधून मधून कमेंटस करुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. या व्यवहारात मला अजिबात काही माहिती नव्हतं. मला माहिती असतं तर लगेच सांगितलं असतं मला विचारुन व्यवहार झालेला आहे. साहजिकच विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार, त्यामध्ये दुमत नाही. मात्र, मला आजच माहिती मिळाली की, याप्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील १ महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

या व्यवहारात माहिती घेतली, चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला होते.मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. जरी माझ्या घरातल्या जवळच्यांचा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. जे काही नियमाप्रमाणं करावं लागेल, चौकशी करावी लागेल, समिती नेमायची असेल ते करा माझा त्या गोष्टीला पाठिंबा राहील. आरोपातील वस्तूस्थिती जनतेला कळणं आवश्यक असते. या व्यवहारात रुपया देखील दिला गेला नाही. मोठे आकडे सांगितले गेले, गोष्टी सांगितल्या गेल्या. परंतु, मला आज जे कळालं जो काही व्यवहार झाला होता तो रद्द करण्यात आला आहे.