तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, क्या करना है बोल?

0
5

दि . ४ ( पीसीबी ) – राज्यात इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमकपणे मैदानात उतरल्यानंतर, तसेच राज ठाकरे यांनी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकार एक पाऊल मागे आलं आहे. सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी व तिसरी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. मात्र, तरीही मनसेनं आयोजित केलेल्या मोर्चाचे रुपांतर विजयी मेळावा म्हणून करण्यात आलं आहे. या विजयी जल्लोषसाठी मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत आहे. 5 जून रोजी वरळीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यातच, मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याला मराठी न बोलण्यावर मारहाण केल्यावरुन इतर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तर, मुंबईत राहायचं असल्यास मराठी आपलं पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे. मात्र, उद्योजक आणि गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी ट्विट करुन थेट राज ठाकरेंनाच डिवचलं आहे.

राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मी गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल? असा थेट सवालही सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरेंना केला आहे.

मुंबईत दोन ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याच्या एक दिवस अगोदरच केडिया यांनी अशा आशयाचं ट्विट केल्यामुळे, मनसैनकिांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुशील केडिया यांनी धमक्याही दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे केडिया यांनी आणखी एक ट्विट केलं असून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आपणास धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे सुरक्षा मिळावी, अशी मागणीही केली आहे. भारताचा एक नागरिक म्हणून मला महाराष्ट्रात, मुंबईत सुरक्षित आणि मान-सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा धमक्यांमुळे यावर प्रश्न उपस्थित होत असल्याचंही सुशील केडिया यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.