…तेव्हा लाज वाटली नव्हती का ?

0
296

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – २०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी धरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?, असा सवाल शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून नेमणूक केलेल्या भरत गोगावले यांनी विचारला आहे. दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटातील शाब्दीक लढाई आता वाढत असल्याने पुन्हा मनोमिलनाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे एका जेष्ठ नेत्याने सांगितले. शिंदे गटाला अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी आता भाजपामध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचे जेष्ठ विधीज्ञ असिम सरोदे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

पुढे बोलताना गोगावले यांनी, “आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे ना राजीनामा देण्याची,” असेही म्हटले आहे. दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना शिवसेनेतील आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असणाऱ्यांबरोबरच शिवसेनेला केलं आहे.

“शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेल्या आम्हा मावळ्यांची हिंमत काय आहे हे उभ्या जगाने पाहिले आहे. तुम्हालाही त्याची अनुभूती आली असेलच. बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची ही हिंमत आहे. त्यामुळे कुणी आम्हाला आव्हान देऊ नये. त्याचे चटके अनेकांना सहन होणार नाही,” असा अप्रत्यक्ष इशाराही गोगावलेंनी दिला आहे.

“शिवसेनेचे काही आमदार आजही या युतीच्या बाहेर आहेत. त्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज बाळगत काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या हिंदूत्वाची पुन्हा एकदा कास धरावी,” असे आवाहनही गोगावलेंनी केले. “सुबह का भूला शाम को धर लौटा तो उसे भूला नही केहेते,” असेही गोगावले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिंदे गटाला अपात्रतेची कारवाई टाळायची तर सरळ भाजपामध्ये अथवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी टळली आहे, परंतु सरकार वाचवायचे तर शिंदे गटापुढे अन्य पर्याय दिसत नसल्याचे कायदे तज्ञांनी सांगितले आहे.