“तुझ्या पोरीला आम्ही काय फुक्कट नांदवायची काय, म्हणून मारून टाकले

0
5

पिंपरी,दि. २१ – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर धक्कादायक तपशील समोर येत आहे. वैष्णवीचा तिच्या सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, या छळाला कंटाळून तिने गळफास लावून जीवन संपवलं आहे असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आता ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या घरचे रुग्णालयात गेले असता, ‘आमच्या मुलीला काय झाले?’ अशी विचारणा केली असता, तिच्या जावयाने, “तुझ्या मुलीला मारून टाकले,” असे उत्तर दिले, ज्यामुळे वैष्णवीचे घरचे हादरले. वैष्णवीच्या अकाली निधनाने पिंपरी-चिंचवडमधील कस्पटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वैष्णवीच्या सासरची मंडळी तिला सतत मारहाण करत :
वैष्णवी आणि तिचा नवरा यांच्यात सतत खटके उडत होते. सासू तिला अतोनात छळायची. वैष्णवीच्या सासरची मंडळी तिला सतत मारहाण करून माहेरी पाठवून द्यायची आणि पैशांची मागणी करत असे. काही दिवस वैष्णवीचे वडील आपल्या मुलीची समजूत काढून तिला सासरी पाठवून द्यायचे. लेकीला त्रास नको म्हणून त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, परंतु ज्यावेळी २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर वैष्णवीचा जास्तच छळ करण्यास त्यांनी सुरुवात केली, असे सांगताना वैष्णवीच्या वडिलांना रडू आवरेना.

वैष्णवीचे वडील म्हणाले की, १६ मे रोजी वैष्णवीच्या नवऱ्याने फोन करून ‘तुमच्या मुलीला घेऊन जा’ असे सांगितले होते. त्यानंतर काय झाले हे विचारण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी फोन केले, मात्र सासरी कोणीही उत्तर दिले नाही. दुपारी ४:३० वाजता वैष्णवीच्या नवऱ्याने फोन करून ‘वैष्णवीने गळफास घेतला असून, तुम्ही चेलाराम हॉस्पिटल बावधन येथे या’ असे सांगितले. त्यामुळे वैष्णवीचे वडील आणि त्यांचे नातेवाईक चेलाराम हॉस्पिटलमध्ये पोहोचले असता, त्यांची मुलगी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती.

शरीरावर मारहाणीच्या खुणा :
वैष्णवीच्या वडिलांनी आणि त्यांचे दाजी उत्तम बहिरट यांनी डॉक्टरांना भेटून वैष्णवीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली असता, डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, “पेशंट ही उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाली असून तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत.” हे ऐकून वैष्णवीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहिल्या असता, तिचे दोन्ही हातांवर, दोन्ही मांडीवर, पायांवर, पाठीवर, डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनुवटीवर कसलातरी लालसर वण दिसून आला.

जेव्हा शशांक आणि त्याचे वडील राजेंद्र यांना वैष्णवीच्या अंगावरील जखमा कशाने झाल्या आहेत अशी विचारणा केली असता, शशांक आणि राजेंद्र यांनी सांगितले की, “तुला आधीच सांगितले होते की, आम्हाला पैसे पाहिजेत, तुझ्या पोरीला आम्ही काय फुक्कट नांदवायची काय, म्हणून मारून टाकले तुझ्या पोरीला.” जावयाच्या या शब्दांनी वैष्णवीच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला. वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून मृत्यूपूर्वी क्रूर वागणूक देत, तिचा जाच करून तिचा खून केला गेला आहे.