ताम्हिणी घाटातील रस्ता खचला, २ ते ५ ऑगस्ट पर्यंत वाहतूक बंद

0
68

रायगड, दि. २ ऑगस्ट (पीसीबी) – रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटातील रस्ता खचला असल्याने रस्ता दुरुस्तीच्या कारणासाठी 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे ते मालेगाव ते पुणे रायगड जिल्हा हद्दीपर्यंत रुंदीकरणाचे काम चालू असून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक ६३/००० या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्ग पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. या दुर्घटनेमुळे हॉटेल पिकनिक येथील फॅमिली हॉटेलमधील एका व्यक्तीचा मृत्यू आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना देखील यावेळी घडली होती.

पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथे एक ऑगस्ट रोजी पुणे ताम्हिणी क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक ६१/६५० ते ६१/६८० मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेली असून रस्ता पूर्णपणे खचला आहे हा घाट वनपरिक्षेत्रात असून पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे आणि रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू असून आत्ता या महामार्गावरील वाहतूक एका बाजूने चालू ठेवलेली आहे. परंतु पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता अजून खचण्याची आणि अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे.

रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यजा करतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथील भागात खटलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी २ ऑगस्ट २०२४ पासून ५ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातून पुण्याला जाणारा वरंधघाट आधीच बंद आहे. त्यामुळे पोलादपूर महाड माणगाव तसेच रोहा आणि श्रीवर्धन विभागातील नागरिकांना पुणे येथे जाण्यासाठी एकमेव असलेला ताम्हणी घाट २ ऑगस्टपासून ५ ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने या परिसरातील नागरिकांनी कोणत्या रस्त्याने जायचे असा सवाल राज्य शासनाला केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीमुळे घाट परिसरातील रस्ते बंद होतात याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी का करीत नाहीत असा सवाल वाहतूकदार संघटनेकडून विचारला जात आहे.