ठाकरे सरकारचे ४०० जीआर शिंदेंनी केले रद्द

0
250

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : “आम्ही कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. मात्र, घाईगडबीत चारशे जीआर काढले. त्याला स्थगिती दिली आहे.” अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांवर शिंदे सरकारकडून स्थगिती दिली जात आहे. त्यामुळे राज्यात नवीन वादाला सुरवात झाली आहे.

याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, ” काल मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलो होतो. राष्ट्रपती निवडून आल्या. त्यासाठी स्हेनभोजन ठेवले होते. तिथे काही बैठक, चर्चा झाली नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. आम्ही कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. मात्र, घाईगडबीत चारशे जीआर काढले. त्याला स्थगिती दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबबत काही प्रश्नच नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत.”एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरूनही वाद सुरु आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले, ” मी काही वर्षे गडचिरोलीत पालकमंत्री म्हणून काम केले. या काळात पोलिसांनी नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली. माझे टार्गेट नक्षलवाद कमी करणे, विकास करणे होते.

मात्र, त्यात अडथळे आणले. पोलिसांनी 27 नक्षलवाद्यांना संपवले. त्यांचा सन्मान मी केला. त्यामुळे नक्षलवाद्यांनी पत्र दिले. धमक्या दिल्या. यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. त्यानंतर झेडप्लस सिक्युरिटी घ्यावी अशी शिफारस पोलिस आणि गृहविभागाने केली. यावर शंभूराज देसाई यांनी भूमिका मांडली. मात्र, अशा धमक्यांना मी भीत नाही.” “आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेबांना आवडणारी आहे. त्यांच्या विचारांची भूमिका घेतलीय. बाळासाहेब-मोदी यांचा फोटो लावून आम्ही निवडणूक लवढवली. जनतेने आम्हाला कौल दिला. मात्र, दुर्दैवाने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमचे खच्चीकरण केले. शिवसैनिकांच्या तडिपाऱ्या केल्या. अन्याय दूर करण्यासाठी लढा असे बाळासाहेब म्हणाले होते. आता आमच्या भूमिकेने बाळासाहेबांना आनंदच होत असेल.” असा विश्वासही यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.