ठाकरे बंंधुंचा घेतला धस्का, महायुती एलर्ट मोडवर

0
6

दि . २८ ( पीसीबी ) – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना रोखण्यासाठी महायुतीने ‘नो रिस्क’ हे धोरण अवलंबिण्याचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील. जेणेकरुन महायुतीच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा ठाकरे बंधूंना मिळणार नाही. त्यामुळे मुंबईत शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजप हे तिघे मिळून ठाकरे बंधुंशी दोन हात करतील. शिवसेना आणि मनसे एकत्र गठ्ठा मते ही महायुतीसाठी आव्हानात्मक असल्याने फडणवीस, पवार आणि शिंदे यांनी चर्चा सुरू केली असून नव्याने व्युहरचना करण्याचे नियोजन आहे.

मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाचे जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर महायुतीने ‘नो रिस्क’ हे धोरण स्वीकारले आहे. या धोरणातंर्गत मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल. ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून प्रत्येक वॉर्डात निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करेल.

मुंबई पालिकेवर गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुती पोलखोल करणार आहे. तसेच मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतील्या आमदारांकडे दिली जाईल. हे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते महायुतीच्या कामांची माहिती सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. कोकणी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स, एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच गोविंदा पथक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरु झाल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक पार पडली होती. या बैठकीत या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना आपापल्या मतदारसंघातील पाच महत्त्वाच्या कामांची यादी देण्याची सूचना केली. ज्या कामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशा मतदारसंघातील पाच कामांची यादी द्यावी, ही कामं सरकारकडून तत्परतेने मार्गी लावली जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिले होते.

या बैठकीत भाजप आमदारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची फारशी फिकीर करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केल्याचे समजते. उद्धव आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आले तर मतांच्या टक्केवारीत नक्कीच फरक पडेल. पण मराठी-अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपलाही होऊ शकतो. राज आणि उद्धव ठाकरे यांचे जास्त नगरसेवक निवडून आले तरी पालिकेवर त्यांचीच सत्ता येईल असे नाही, असे मत भाजप आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास मराठी मतदारांची मतं त्यांच्याकडे वळू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपने रणनीती आखली आहे. मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं, मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे.