ठाकरे गटात प्रवेश करताच काही दिवसांत ३२ जणांवर गुन्हे दाखल

0
235

नाशिक, दि. १ (पीसीबी) – ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. मालेगावमधील वेगवेगळ्या दोन पोलिस ठाण्यामध्ये यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह एकूण ३२ जणांवर हा गुन्हा करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये हिरे कुटुंबातील काही व्यक्तींचा समावेश असल्याने या गुन्ह्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात उभं केल्यानंतर ही कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हिरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याने मालेगावसह नाशिक जिल्ह्यात गुन्हा कोणत्या कारणावरून दाखल झाला असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत.

महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. त्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती त्यावरून दूसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूणच दोन्ही गुन्हे पाहता हिरे कुटूंबियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव शहरातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यानंतर अद्वय हिरे यांची राजकीय ताकद वाढली होती. त्यामुळे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू रंगल्या आहेत.