वारकरी परंपरेच्या साजात, विद्यार्थ्यांच्या सहभागातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी राबवण्यात आला मतदार जनजागृतीचा अभिनव उपक्रम
दि.२७(पीसीबी)- “मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणानी दुमदुमला परिसर सोबत टाळ–मृदुंगाचा गजर… लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष.. महापुरुषांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी… वारकरी परंपरेचा साज आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण… अशी संस्कार, इतिहास आणि मतदानाचे महत्त्व यांचा संगम साधणारी ‘मतदानाची दिंडी’ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील संतपीठ परिसरात काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने मतदान करणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप कार्यक्रमांतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे.
या अंतर्गत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संतपीठ येथील प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा येथे ‘दिंडी-मतदानासाठी ’ हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी परंपरेचा साज चढवलेले विद्यार्थी, टाळ–मृदुंगाच्या गजरात, भक्तिरसाने भारलेले वातावरण, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शाळेच्या परिसरातून निघालेली मतदानाची दिंडी जवळच असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, कॉलनी येथे गेली. त्याठिकाणी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळुक यांच्यासह शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे पालक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा – तृप्ती सांडभोर
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले की, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हे समजावून सांगावे की मतदानाचा दिवस ही केवळ सुट्टी नसून लोकशाहीच्या मजबुतीसाठीची जबाबदारी आहे. जसे तुम्ही खाऊसाठी आई–वडिलांकडे हट्ट धरता, तसाच हट्ट शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करण्यासाठी करावा. अशा अभिनव आणि संस्कारक्षम उपक्रमांतून निश्चितच मतदानाचा टक्का वाढेल. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचवणारा हा उपक्रम असून, पालकांपर्यंत प्रभावीपणे मतदानाचा संदेश पोहोचविण्यात येईल.
कीर्तनातून सांगण्यात आले मतदानाचे महत्त्व
संतपीठ शाळेतील विद्यार्थिनी ह.भ.प. श्रुती रोडे हिने कीर्तनातून मतदानाचे लोकशाहीतील अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. मतदानामुळे लोकशाही कशी बळकट होते आणि नागरिकांची जबाबदारी कशी अधिक दृढ होते, याचे प्रभावी प्रबोधन या सादरीकरणातून घडले. याच वेळी मतदान जनजागृतीपर पथनाट्यही सादर करण्यात आले.
“हक्क आपल्या मतदानाचा” गीताचे सादरीकरण
संतपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी “हक्क आपल्या मतदानाचा” हे प्रेरणादायी गीत सादर केले. हे गीत संतपीठ शाळेतील शिक्षकांनी रचले असून, विद्यार्थ्यांना गीत सादर करताना किबोर्ड वादक श्रुती तनपुरे, पखवाज वादक अविनाश भोगील आणि तबला वादक विवेक भालेराव यांनी साथ दिली. या गीताच्या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले.
मतदानाची शपथ
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.










































