टाटा मोटर्स कामगारांत नाराजीचा सूर

0
441

– दिवाळी बोनस आणि वेतनवाढ कराराच्या मुद्यावर खंडेनवमी-दसरा पूजेवर बहिष्कार

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात दसरा-दिवाळीला कामगारांचे बोनस जाहीर होत असतात. सर्वाधिक बोनस कोणती कंपनी देते याची स्पर्धा असते. प्रामुख्याने सर्वात मोठी कंपनी म्हणून टाटा मोटर्स कामगारांना किती बोनस मिळतो याकडे कामगारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिलेले असते. यावेळी टाटा मोटर्सच्या कार प्लॅेन्ट विभागातील वेतनवाढ करार रखडला आणि त्याचवेळी बोनसबाबत निर्णय जाहीर होत नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. कामगार संघटनेत याच मुद्यावर दोन गट पडल्याचे दिसत आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या कार विभागातील (कार प्लांट) वेतनवाढ करार रखडला असल्याने आधीच कामगारांमध्ये तीव्र नाराजी असताना, दिवाळीचा बोनस निर्धारित कालावधीत जाहीर न झाल्याने या नाराजीत आणखी भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून कामगारांनी कंपनीच्या दसरा-खंडेनवमीच्या सामूहिक पूजेवर बहिष्कार टाकला. याद्वारे कामगारांमधील असंतोष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

टाटा मोटर्सच्या कामगारांचा व्यवस्थापनाशी ३ मे २०२२ रोजी वेतनवाढ करार झाला. सुरूवातीपासून दर तीन वर्षांनंतर करार होत होता. यंदापासून तो दर चार वर्षानंतर होईल, असा बदल करण्यात आला. तो कामगारांना मान्य नव्हता. कामगारांचा विरोध असतानाही तो करार मान्य करण्यात आला. इतर विभागांचा वेतनवाढ करार झाला, त्या पध्दतीने कार विभागाचा करार झाला नाही. तो बराच काळ रखडला. त्यावरून या विभागातील कामगारांमध्ये नाराजी आहे.

कंपनीने कामगारांच्या नाष्ट्याची वेळ बदलून ती कमी केली. जवळपास २ हजार कामगारांनी चहा, नाष्ट्या व जेवणावर बहिष्कार टाकून कामगारांनी आपली नाराजी तेव्हा व्यक्त केली. ही घटना ताजी असतानाच नाराजीनाट्याचा दुसरा अंक खंडेनवमीच्या दिवशी दिसून आला. यावेळी नाराजीचे कारण बोनस होते. दसऱ्यापर्यंतही बोनसची घोषणा झाली नाही म्हणून कामगारांमध्ये असलेली नाराजी नव्याने उफाळून आली. कंपनीच्या परंपरेप्रमाणे कामगार, पदाधिकारी आणि व्यवस्थापनातील अधिकारी प्रत्येक विभागात जाऊन एकत्रितपणे खंडेनवमीची पूजा करतात. तथापि, या वर्षी तसे झाले नाही. नाराजीमुळे कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनाशी असहकार पुकारत पूजेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, कामगारांनी आपापल्या जागेवर वैयक्तिक पूजा केली. मात्र, संयुक्तपणे कंपनीच्या विविध भागात दिवसभर होणाऱ्या पूजांचे कार्यक्रम यावेळी होऊ शकले नाहीत.

कार विभागाचा वेतनवाढ करार झाल्याशिवाय बोनसवर चर्चा नको, अशी अट कामगार संघटनेने व्यवस्थापनासमोर ठेवली आहे. वेतनवाढ करार व बोनसचा विषय परस्परांशी जोडू नये, असे बहुसंख्य कामगार नेत्यांचे म्हणणे आहे. त्यावरून दोन गट पडले आहेत. कामगार नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा व्यवस्थापनाकडून घेतला जात असून त्यामुळे आमचे नुकसान होत असल्याची भावना कामगारांमध्ये आहे.

१९८९ मध्ये टाटा मोटर्स कामगारांनी वेतनवाढ कराराच्या मुद्यावर अभूतपूर्व असे आंदोलन छेडल्याने संपूर्ण कारखानदारी हादरली होती. आजही त्या आंदोलनाच्या आठवणी कामगार सांगतात. कामगार नेते राजन नायर यांच्या नेतृत्वाखाली झालेला तो लढा पिंपरी चिंचवड शहरातील एक एतिहासिक लढा ठरला. त्यानंतरच्या काळात कधी मधी वेतनवाढ कराराच्या मुद्यावर थोडिफार कुरबूर झाली, पण प्रत्येकवेळी व्यवस्थापनानेही सामंजस्याची भूमिका घेतल्याने वाद जागेवर मिटले. आता पुन्हा वेतनवाढ कराराचाच मुद्या कळीचा ठरत असल्याने व्यवस्थापन काय पावले उचलणार याकडे कामगार जगताचे लक्ष आहे.