“जीवनशैलीतील बदल हृदयविकार दूर ठेवतो!” – वासंतिक व्याख्यानमाला – पुष्प दुसरे

0
215

पिंपरी, (दिनांक : ०७ मे २०२३) “दैनंदिन जीवनशैलीतील बदल हृदयविकार दूर ठेवतो!” असे प्रतिपादन डॉ. अर्चना वाजगे – हांडे यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक ०६ मे २०२३ रोजी केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘सशक्त हृदयाची गुरूकिल्ली’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना डॉ. अर्चना वाजगे – हांडे बोलत होत्या. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अश्विनी चिंचवडे यांनी आपल्या मनोगतातून, “ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेने २७ वर्षांच्या कालावधीत वासंतिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रबोधन केले आहे!” असे गौरवोद्गार काढले. डॉ. अर्चना वाजगे – हांडे पुढे म्हणाल्या की, “मूल जन्माला येण्यापूर्वीच गर्भात त्याचे हृदय कार्यरत झालेले असते. हृदयावर मेंदूचे नियंत्रण नसते. रक्ताभिसरण हे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या हृदयाची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, टू डी एको अशा विविध चाचण्यांद्वारे हृदयाच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाते.

आहार, व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्य या गोष्टी उत्तम हृदयासाठी गरजेच्या आहेत. आहारात ५० टक्के भाज्या, २५ टक्के डाळी – कडधान्ये आणि २५ टक्के पोळी – भात असे प्रमाण ताटात हवे.‌ मीठ आणि साखर यांचा अत्यल्प वापर तसेच डबाबंद आणि बेकरीतील पदार्थ टाळावेत. सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फलाहार घ्यावा; याशिवाय सॅलड, सूप यांचा आहारात समावेश करावा. शक्यतो जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शरीराला कष्ट होतील इतपत व्यायाम नियमितपणे करावा. चालणे, पोहणे, नाचणे, सायकलिंग असे व्यायाम; सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम या क्रियांचा समावेश करून झेपेल इतकाच व्यायाम करावा. रात्रीचे जेवण लवकर घेऊन झोपण्यापूर्वी दोन तास आधी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स टाळून पुरेशी झोप घ्यावी. ताणतणावाचे नियोजन केल्यास मानसिक आरोग्य लाभते. नियमित आरोग्य तपासणी आणि दिनचर्येतील सकारात्मक बदल म्हणजे सशक्त हृदयाची गुरूकिल्ली होय!” व्याख्यानानंतर त्यांनी श्रोत्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीत.

रत्नमाला खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. गोपाळ भसे यांनी परिचय करून दिला. चंद्रकांत कोष्टी यांनी स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. नंदकुमार मुरडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने सांगता करण्यात आली