जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली

0
156

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : मराठा आरक्षणविषयक विजयी सभेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या कार्याचं कौतुक केलं तसेच मराठा समाजानं शांततेनं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं त्याबद्दल आभार मानले. तसेच आपण दिलेला शब्द पाळतो, जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली, असं सांगितलं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांच मी अभिनंदन करतो. व्यासपीठावरुन मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की, सगळ्या जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडं लागलं होतं.

आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय शिस्तीनं हे आंदोलन आपण मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली केलं. कुठंही या आंदोलनाला गालबोट न लावता हे आंदोलन आपण यशस्वी केलं याबद्दल मी इतर तुमचे अभिनंदन करतो”

जरांगेंचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमच्यावर असलेलं प्रेम आम्ही पाहिलं. शेवटी मराठा समाज आपला न्याय हक्क मागताना इतर कोणालाही त्रास नको याची काळजी घेतली, यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही गोरगरीब मराठ्याची कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तो शब्द मी पूर्ण केला आहे. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे.

आज आमच्या दिघे साहेबांची जयंती आहे, बाळासाहेबांची जयंती २३ तारखेला झाली. या दोन्ही गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील आमच्या पाठीशी आहेत. जमलेल्या मराठा बांधव-भगिनींचं स्वागत करतो. अण्णाभाऊ पाटील यांच्या भूमीत हा ऐतिहासिक सोहळा साजरा होतो आहे, याचा आनंद आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.