जालिंदर सुपेकर यांनी ३०० कोटी रुपयांची मागणी केली…

0
22
  • आमदार सुरेश धस यांनी केला धक्कादायक आरोप

दि . ४ ( पीसीबी ) – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच, आता या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबाचे मामा आणि आयपीएस (IPS) अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी ३०० कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप धस यांनी केला आहे, ज्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना आमदार सुरेश धस यांनी हा धक्कादायक आरोप केला. सुरेश धस यांनी म्हटले की, वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी कारागृहात असलेल्या आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुपेकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आमदार सुरेश धस यांनी पुढे बोलताना सुपेकर यांच्यावर थेट नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता… म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात… त्यांच्यात नैतिकता नाही…” त्यांनी हगवणे कुटुंबाच्या १५० कोटी रुपयांच्या मालमत्तेचाही उल्लेख करत म्हटले की, “आता १५० कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहेत… काही लोकांनी टमाटे हाणले, मात्र त्याने काही होणार नाही… हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे,” असे चिथावणी देणारे वक्तव्य सुरेश धस यांनी केले. हे वक्तव्य त्यांच्या संतापाला आणि या प्रकरणातील नैतिक अधःपतनावरच्या टीकेला दर्शवते.

सुरेश धस यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, भविष्यात आष्टी मतदार संघाने हगवणे कुटुंब जामिनावर सुटले, तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि ‘कवट’ तयार ठेवा, असे चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केले. यापूर्वी, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सुरेश धस यांनी आरोपांचा धुरळा उडवला होता.
त्या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले होते, त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली होती. आता सुरेश धसांच्या रडारवर जालिंदर सुपेकर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, कारण या प्रकरणाला आता राजकीय रंग प्राप्त झाला आहे.