जमिनीचा वाद; माण ते चाकण पाठलाग करत चुलता पुतण्याची हत्या

0
3

सात जणांना जन्मठेप

हिंजवडी, दि. 30 (प्रतिनिधी)

जमिनीच्या वादातून माणमधील चुलता पुतण्याचा माण पासून चाकण पर्यंत पाठलाग करत चाकण परिसरातून अपहरण करून खेड तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे दांडके आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या नऊ पैकी सात आरोपींना राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील एक आरोपी मयत झाला असून, एक अल्पवयीन आहे. ही घटना 11 जुलै 2009 रोजी घडली होती.

रोहिदास ऊर्फ गणपत ऊर्फ बाळू जयसिंग ठाकर (वय 39, मयत), राजू जयसिंग ठाकर (वय 36), संतोष जयसिंग ठाकर (वय 24), प्रीतम ऊर्फ रोड्या पंडीत ठाकर (वय 19), जगदीश ऊर्फ गोट्या शिवाजी ठाकर (वय 21), चंद्रशेखर शिवाजी ठाकर (वय 19), तुषार प्रल्हाद ठाकर (वय 19) व रघुनाथ दामू पारखी (वय ५७, सर्व रा. माण, ता. मुळशी) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पंढरीनाथ सदाशिव पारखी (वय 60),चंद्रकांत ऊर्फ पप्पू ज्ञानोबा पारखी (वय 37, दोघेही रा. माण, ता. मुळशी, जि. पुणे) यांचा खून झाला होता. मयत चंद्रकांत ऊर्फ पप्पू पारखी याने खरेदी केलेली 73 गुंठे जमीन मयत आरोपी रोहिदास ठाकर याला विक्रीच्या हेतूने साठेखत करून दिली होती. रोहिदासला मुदतीत हा व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यावरून पुणे न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाने पारखीच्या बाजूने निकाल दिला होता. त्याचा राग ठाकर परिवाराला होता.

घटनेच्या दिवशी चंद्रकांत आणि चुलते पंढरीनाथ हे चाकण येथे शनिवारच्या बाजारात गेले होते. त्यांच्यासोबत आरोपी रघुनाथ पारखी देखील होता. बाजारातील काम उरकल्यावर ते चाकण रोहकल रस्त्यावर असलेल्या पंढरीनाथ पारखी यांच्या मुलीकडे थांबले. तेथून बाहेर पडले तेव्हा काही अंतरावर संगनमत करून त्यांच्या पाळतीवर असलेल्या आरोपींनी त्यांना गाठले. जबरदस्तीने पिंपरी खुर्दच्या आडरानात नेऊन सर्वांनी दोघांवर लाकडी दांडके आणि दगडांनी ठेचून हल्ला केला. यामध्ये हे दोघे चुलते पुतणे जागीच ठार झाले होते. घटनेनंतर या प्रकरणाचा थांगपत्ता लागू नये म्हणून आरोपींनी पुरावे देखील नष्ट केले होते.

पंढरीनाथ यांचा मुलगा संदीप पारखी याने चाकण पोलिसांत याबाबत फिर्याद दिली होती. दोन परिवारांतील वाद माण परिसरात माहिती असताना देखील सुरुवातीला पोलिसांनी पारखी कुटूंबातील भावकीतील वेगळ्याच आरोपींना अटक केली होती. पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. मात्र पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने भाऊसाहेब आंधळकर यांच्या पथकाने खरे मारेकरी शोधून त्यांना गजाआड केले. हा तपास पुढे सीआयडीकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक दीपाली घाडगे यांच्या पथकाने फरार आरोपी शोधून काढले व त्यांना अटक केली. दोन वर्षांनी हे सर्वजण जामिनावर बाहेर पडले.

सन 2014 मध्ये राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू झाला. विशेष सरकारी वकील अॅड. विजय सावंत यांनी पारखी यांची बाजू न्यायालयात मांडली. एकूण 20 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार खून करणाऱ्या आरोपींना न्यायाधीश सय्यद यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड, अपहरण व कटकारस्थानासाठी 5 वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायालयाच्या निर्णयामुळे माण गावात एकच खळबळ उडाली असून तब्बल एक तपानंतर पारखी चुलत्या पुतण्याला न्याय मिळाला असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

तब्बल 15 वर्षांनंतर खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली. त्यामुळे न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली असली तरी. न्यायालयाने सर्व सामान्य शेतकरी कुटूंबाला न्याय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भगवान के घर देर है, अंधेर नहीं याची प्रचिती आली.

  • संदीप पंढरीनाथ पारखी (फिर्यादी)