पिंपरी, दि. २९ – गेले पंधरा दिवस गाजत असलेल्या चऱ्होली टीपी स्किमला परिसरातील सर्व ग्रामस्थांनी कडवा विरोध केल्याने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना त्यांचा निग्रह गुंडाळण्याची वेळ आली. टीपी स्किम स्थगित करत असल्याचे लेखी आदेश आयुक्त शेखर सिंहल यांनी आज दिले आहेत. प्रशासन काही केल्या ऐकत नसल्याने चऱ्होली गावकऱ्यांनी उद्या शुक्रवारी ३० मे रोजी पुकारलेला गावबंद अंगलट येणार असल्याने प्रशासन झुकले. गावकऱ्यांचा विरोध आणि आमदार महेश लांडगे यांचा विरोध म्हणून स्थगिती देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर आयुक्त सिंह यांना फोन केल्याने स्थगिती मिळाल्याचे सांगण्यात आले.
कुदळवाडी येथे ३८० हेक्टरची एक आणि चऱ्होली येथे विविध पाच मिळून एकूण १४२५ हेक्टरच्या टीपी स्किमचा इरादा १५ मे रोजी आयुक्त शेखर सिंह यांनी जाहीर केला होता. १ मे रोजी त्याबद्दल दोन वर्तमानपत्रांत जाहीरात प्रसिध्द केली होती. महापालिका सभेत तो निर्णय घेण्यात आला. कुदळवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईच्या नावाखाली ४५०० अतिक्रमणांची कारवाई केली ती खरे तर टीपी स्किम साठीच होती असे म्हटले. तो आरोप आमदार महेश लांडगे यांना झोंबला आणि कुदळवाडी गावकऱ्यांच्या विरोधामुळे तिथे टिपी स्किम गुंडाळावी लागली.
चऱ्होली परिसरात पाच टीपी स्किम जाहीर केल्याने गावकरी संतापले होते. पीसीबी टुडे मधून या दोन्ही विषयांवर नागरिकांची बाजू लावूण धरली आणि वास्तव चित्र काय आहे ते मांडले. त्यानंतरही आयुक्त शेखर सिंह हे आपण टीपी स्किम राबविणारच असा हेका लावून होते. चऱ्होली ग्रामस्थांनी वारंवार संपर्क करूनही त्यांना आयुक्त प्रतिसाद देत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी प्रशासनाला इंगा दाखवायचे ठरवले आणि गावबंदी पुकारली. टप्प्या टप्प्याने महापालिका कार्यालयाला टाळे, रस्तारोखो आदी इशारा गावकऱ्यांनी दिला. सोमवारी त्याबाबत सकारात्मक निर्णय करणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र, तिथेही टाळाटाळ सुरू केली होती. प्रसंगी प्रशासकाला काळे फासण्यापर्यंतची तयारी संतप्त युवकांनी केली होती.
महापालिका आयुक्तांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि अखेर आज टीपी स्किम स्थगित करत असल्याचे आदेश काढले. टीपी स्किम रद्द करा, स्थगित नको, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
आयुक्तांच्या आदेशावर बोलताना माजी महापौर नितीन काळजे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे आणि गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे हा आदेश झाला. मनाप्रमाणे झाल्याने आता उद्याच्या शुक्रवारचा गावबंदीचा निर्णय माघे घेत आहोत.