कुटुंबापासून दुर राहून सेवा बजावत असलेल्या सैनिकांना पिंपरी चिंचवडमधील भगिनींकडून रक्षाबंधन

0
43

देहुरोड दि. २१- “आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा, सण आणि उत्सव यांना फार महत्त्व आहे. प्रत्येक सण साजरा करण्यामागे शास्त्रीय, भावनिक व सामाजिक कारणे आहेत. आज संपूर्ण भारतात राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ बहीणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो आणि ते निभावतो. वास्तविक पाहता सदासर्वकाळ बहिण भाऊ एकमेकांवर निस्सीम प्रेम करीत असतातच, परंतु विवाह व अन्य कारणांमुळे वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या बहिणभावांनी या निमित्ताने आवर्जून एकमेकांच्या घरी यावे, कौटुंबिक उत्सव साजरा करावा अशीही एक संकल्पना देखील यामागे आहे. अशा अनेक सण – उत्सवांमुळे आपण कौटुंबिक व सामाजिक स्तरावर एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत.” असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे विश्वस्त भास्कर रिकामे यांनी यांनी काढले. निमित्त होते देहुरोड येथील 29 FAD म्हणजेच २९ फिल्ड अम्युनेशन डेपो मध्ये आपल्या कुटुंबापासून दूर राहून देश सेवा बजावत असणाऱ्या सेन्यदलातील अधिकारी व सैनिकांना पिंपरी चिंचवडमधील भगिनींच्या हस्ते रक्षाबंधन.
देहुरोड तसेच पिंपरी चिंचवडमध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक आदि क्षेत्रात कार्यरत असणारे जेष्ठ डॉक्टर रमेश बन्सल यांच्या माध्यमातून दरवर्षी असा हा आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला जातो. यावेळी सैनिकांचे स्वागत करताना डॉ. रमेश बन्सल म्हणाले ” मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्य दलातील अधिकारी व जवान आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दुर राहून अविरत सेवा बजावत आहेत. या सर्व जवानांसोबत आपण सर्वजण सदैव आहोत. ते सर्वजण आपल्याच कुटुंबातील घटक आहेत आणि म्हणूनच या सर्व भगीनी त्यांना राखी बांधण्यासाठी येतात. एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात. आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहोत.”
डपोचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पोन्नापा यांनी उपस्थितांचे सवागत केले. ते म्हणाले “दिपावली, रक्षाबंधन अशा सणांच्या वेळी आम्हाला कुटुंबाची आठवण येते. परंतु आपण व आपल्या सारख्या काही संस्था आमच्या सोबत असा आनंदोत्सव साजरा करतात. यामुळे आम्हालाही एक प्रकारची उर्जा मिळते, घरच्या आठवणीने आलेली मरगळ जाऊन पुन्हा चैतन्य निर्माण होते.”
याप्रसंगी अखिल भारतीय अगरवाल सभेचे सचिव अनिलजी मित्तल, श्रीमती नारायणदेवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल, इनर व्हिल क्लब ऑफ निगडीच्या सेक्रेटरी कमलजित कौर, विश्व हिंदू परिषदेच्या शारदा रिकामे, सावरकर ग्रंथालयाच्या गीता खंडकर आदि उपस्थित होते.
उत्स्फूर्त घोषणा, देशभक्तीपर गीते, सनईच्या स्वरात, प्रसन्न वातावरणात आणि सुशोभित केलेल्या भव्य सभागृहात रक्षाबंधन करण्यात आले.
पारंपरिक पध्दतीने वेषभूषा व अलंकार परिधान करुन आलेल्या इनर व्हिल क्लब ऑफ निगडी प्राईड, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, शाहुनगर, विश्व हिंदु परिषद , मातृशक्ती विभाग, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, रॉबिनहुड आर्मी आदि संस्थांच्या भगिनींनी औक्षण करुन, मिठाई भरवून व भेटवस्तू देऊन सैनिकांना राख्या बांधल्या. राखी बांधताना प्रत्येक बहिणीचा ऊर अभिमानाने भरुन येत होता तर आपल्याला इतक्या दुर एक बहिण भेटली याचा आनंद सैनीकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशिष अगरवाल यांच्यातर्फे सर्वांसाठी भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या.
कमलजीत कौर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सारीका रिकामे सर्व अधिकारी तसेच सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले. तसेच कायम आठवणीत राहिल असे उपक्रम सुरु केल्याबद्दल डॉ. रमेश बन्सल यांचे विशेष धन्यवाद मानले. मनेश म्हस्के, दिपक नलावडे आदि मान्यवर उपस्थित होते.
डेपोतर्फे आयोजित केलेल्या अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.