कत्तलखाना विरोधात मोशी ग्रामस्थांची वज्रमूठ, रविवारी निषेध सभा

0
18

पिंपरी, दि . ५ ( पीसीबी ) – तिर्थक्षेत्र आळंदीच्या पंचक्रोशित, दोहू-आळंदी रस्त्यालगत, मोशी आणि डुडुळगाव शिवेवर तसेच अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी यांच्या आश्रमालगत होणारा नियोजित कत्तलखाना रद्द करावा या मागणीसाठी आता मोशी गावच्या सर्व नागरिकांनी वज्रमूठ केली आहे. रविवारी, ८ जून रोजी याच विषयावर ठोस भूमिका घेण्यासाठी निषेध सभेचे आयोजन नागेश्वर महाराज मंदिरात केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका शहर विकास आराखड्यात चार एकर जागेवर कत्तलखाना आणि शेजारीच दुसऱ्या चार एकर जागेवर जनावरांचे रुग्णालय असे आरक्षण टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महारांजांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीला जोडणाऱ्य रस्त्यावरच हा नियोजित अत्यंत आधुनिक पध्दतीचा कत्तलखाना होणार आहे. विदेशात मांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडे तो चालवायला द्याचे प्रस्तावित असल्याने रोज शेकडो जनावरांची कत्तल होणार आहे. आयुष्यभर शाकाहार जपणाऱ्या वारकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याने महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन सह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. हिंदूंच्या भावनेशी खेळण्याचा हा संतापजनक प्रकार असल्याने त्या विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा सर्वांनी दिला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातच हा नियोजित कत्तलखाना होत असल्याने त्यांच्यावरही सर्वांची नाराजी आहे. हे आरक्षण रद्द करण्यासाठी स्वतः स्वामी गोविंद गिरी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संपर्क केला आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आळंदी भेटीत कत्तलखाना आळंदी जवळ होऊ देणार नाही, अशी ग्वाही सर्व वारकऱ्यांना दिली.
दरम्यान, लेखी आश्वासन मिळत नसल्याने मोशी ग्रामस्थांनी हा विषय मनावर घेतला आहे. आरक्षण हटवा, भूमिपूत्र जगवा तसेच कत्तलखाना हटवा, सांप्रदायिकता जपा अशी मोहिम सुरू केली आहे. मूळ शेतकऱ्यांना भूमिहिन करणारी आरक्षणे आणि कत्तलखाना रद्द करण्यासाठी महापालिकेचा निषेध सर्वांनी केला आहे. रविवारी सकाळी १० वाजता नागेश्वर महाराज मंदिरात ही सभा होणार असून सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.