कचऱ्याच्या आगीमध्ये ८ वीजवाहिन्या जळाल्या;

0
74

विश्रांतवाडी, मोशी, धानोरीमध्ये वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. १५ : आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर असलेल्या ओढ्यात ट्रेंचवर फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. यात ट्रेंचमधील महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ८ वीजवाहिन्या जळाल्या. आज पहाटे २.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याट्प्याने सुरु करण्यात आला. तर विश्रांतवाडी, कळस परिसरातील सुमारे १० हजार आणि दिघी परिसरातील १७ हजार अशा २७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२.३० वाजेपर्यंत बंद होता.

याबाबत माहिती अशी की, नगररोड विभाग अंतर्गत आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर एक ओढा आहे. तेथील एका ट्रेंचमध्ये महावितरणच्या ८ वीजवाहिन्या आहेत व त्याद्वारे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, दिघी परिसरातील सुमारे १ लाख ४२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र ओढ्यातील या ट्रेंचवर सातत्याने कचरा टाकण्यात येत होता. साठलेल्या या कचऱ्याला आज पहाटे २.३० च्या सुमारास आग लागली. आग वाढल्याने महावितरणकडून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोबतच अग्निशमन दलानेही त्वरेने दाखल होऊन पहाटे ३ च्या सुमारास आग विझविली.

यानंतर महावितरणकडून सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये पर्यायी व्यवस्थेतून विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. मात्र विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे पर्यायी वीजवाहिन्यांवर भार व्यवस्थापन शक्य नसल्याने या परिसरातील सुमारे १० हजार लघुदाब आणि दिघी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

महावितरणकडून दुरुस्ती कामे त्वरित करण्यासाठी एकाचवेळी ६ कंत्राटदारांना पाचारण करण्यात आले. सोबतच नगररोड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. शारंगधर केनेकर व हर्षितकुमार वाकोडे यांच्यासह शाखा अभियंते, जनमित्रांनी दुरुस्ती कामात सहभाग घेतला. वीजवाहिन्यांचा जळालेला भाग बदलणे, जॉईंट देणे व इतर कामांसह वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे कामे दुपारी १२.३० वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा दुरुस्त केलेल्या वाहिन्यांद्वारे सुरू करण्यात आला.