औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता, पेशवे हे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते – ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडेंचे विधान

0
337

मुंबई,दि.०८(पीसीबी) – दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतल्या व्याख्यानात केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुंबईतल्या एका कार्यक्रमात भालचंद्र नेमाडेंनी हे वक्तव्य केलं. औरंगजेबाचा इतिहास आपण वाचला आहे तो हिंदू द्वेष्टा नव्हता असाही उल्लेख नेमाडेंनी केला.

नेमकं काय म्हणाले नेमाडे?
भालचंद्र नेमाडे म्हणाले, “मी विद्यार्थी असताना आणि एम.ए. करत असताना मुंबई विद्यापीठात येऊन बसत असे. मराठीत मी नापास होणार होतो म्हणून मी तो विषय सोडला आणि इंग्रजी विषय निवडला. मराठी भाषेविषयी मला प्रेम होतं म्हणून मी येऊन बसायचो. इथे अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आली. त्यावेळी मी नाटक लिहिण्याचं मनावर घेतलं होतं. दुसऱ्या बाजीराव हा विषय घेऊन मला नाटक लिहायचं होतं. वा. सी. बेंद्रे इथेच बसायचे. त्यांच्याकडे आम्ही चर्चेसाठी जायचो. काय वाचायचं? काय वाचू नये? याचा सल्ला घ्यायचो. त्यावेळी मी इतिहास वाचला आणि माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंत जो काही इतिहास आपण वाचत आलो तो काही खरा नाही. आपण दुसऱ्या बाजीरावावर खरं लिहिलं पाहिजे.”

गोविंदराव बुंधेलेंना काय सांगितलं जायचं?
पुढे नेमाडे असं म्हणाले, “दुसरा बाजीराव हा खूप मोठा माणूस होता, कारण त्याने पेशव्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात दिला. सगळे पेशवे हे दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते. उदाहरण द्यायचं झालं तर मी नानासाहेब पेशव्यांचं देईन. तरुणांना मी आज हे सांगू इच्छितो की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं कठीण आहे, त्यामुळे पुस्तक वाचलं की सत्य कळतं. नानासाहेब पेशवा कुठेही गेला की त्याचा गोविंदपंत बुंधेलेंकरवी एक निरोप पाठवत असे. नानासाहेब या या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येणार आहेत. आठ ते दहा वर्षांच्या दोन शुद्ध आणि सुंदर मुली तयार ठेवाव्यात. मी यासंदर्भातलं एक पत्र वाचलं आहे. आठ ते दहा वर्षांच्या मुली आणि हा माणूस (नानासाहेब पेशवे) ४०-४२ वर्षांचा.. हा त्या कशासाठी तयार ठेवायला सांगायचा? हा त्यांना मारायचा की अजून काही करायचा ते माहित नाही.”

आम्ही तुकोबारायांचा आदर्श समोर ठेवून चालतो
“अशा या पेशव्यांच्या तावडीतून आपण सुटलो ते फार बरं झालं असं मी बेंद्रे यांना सांगितलं. तेव्हा बेंद्रे माझ्यावर संतापले, इंग्रजांकडे महाराष्ट्र जाणं चांगलं आहे का? असं त्यांनी विचारलं. त्यावर मी त्यांना म्हटलं की आम्ही लीळाचरित्र ऐकून मोठे झालो. तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म गेला. चक्रधरस्वामी आणि तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोण आहे जगात? त्यांचा आदर्श आम्ही ठेवला. त्यामुळे खरं आहे ते आम्ही पाहिलं. इंग्रज हे पेशव्यांच्या बदमाशीमुळेच इथे आले. त्यावेळी माझं मत इंग्रजांबद्दल चांगलं होतं पण इंग्रजही बदमाशच होते. फरक इतकाच आहे की आपल्यापेक्षा कमी बदमाश होते.”

औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता
औरंगजेबाला इतिहासकारांनी हिंदू द्वेष्टा ठरवलं आहे याबाबतचं उदाहरण देताना नेमाडे म्हणाले, “औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान असा भेद नसे. हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वर मंदिरात गेल्या. मात्र त्या परत आल्याच नाहीत. छावणीतले लोक म्हणाले माहित नाही कुठे गेल्या? औरंगजेबाना सखोल चौकशी केली तेव्हा औरंगजेबाला समजलं की तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. त्यामुळे त्याने काशीविश्वेवर मंदिर फोडलं. त्यानंतर इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? पुस्तकं वाचूनच हे कळतं. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात, पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटं असतं.”

“सगळ्या जुन्या गोष्टी इथेच कळतात. शिवाजीचा विश्वासू सहकारी मुसलमान होता. शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास असणारा सहकारी मदारी मेहेतर होता. स्वतःच्या लोकांवर शिवाजीचा जेवढा विश्वास नव्हता तेवढा मदारी मेहेतरवर होता. औरंगजेबाचा सेनापती जयसिंह ज्याने शिवाजीला पकडून दिलं तो हिंदू होता. औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. निम्म्याहून जास्त हिंदू सरदार त्याच्या काळात वाढले, मग तो हिंदू द्वेष्टा वगैरे होता असं कसं म्हणता येईल? सती प्रथा कुणी बंद केली? हे विचारलं की उत्तर येतं की लॉर्ड बेटिंगने. मात्र सतीची प्रथा पहिल्यांदा बंद करणारा औरंगजेबच होता.