औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही – रा.स्व.संघाची भूमिका

0
5

नागपूर दि. 20 पीसीबी – औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नव्हती.

परंतु, बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळूरूमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसार माध्यमांशी विचारलेल्या प्रश्नानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा स्पष्ट शब्दात सुनील आंबेकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंचारावर संघाची भूमिका स्पष्ट केली.

नागपूरात झालेल्या हिंसाचारानंतर आता स्थानिक नागरिकांनी नेमका काय प्रकार घडला ते सांगितले आहे. चार पिढ्यांपासून एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या महाल परिसरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर दोन समाजातील मने दुभंगली आहेत. दंगलखोरांनी जुने हिस्लॉप कॉलेज परिसरात नागरिकांची घरे, गाड्यांवर दगडफेक केली. यात अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. पेशने यांच्या घरातील चारचाकी जळून खाक केली. दंगलखोरांनी घराच्या दारावरील, वाहनांवरील छायाचित्र पाहून तोडफोड केली, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
दंगलखोरांनी वाहनांवरची हिंदू धर्मातील छायाचित्रे पाहून केली जाळपोळ, नागरिकांनी सांगितला दंगलीचा थरार

सुनील आंबेकर नेमके काय म्हणाले?
सध्या नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवर संघाची भूमिका काय आहे? असा प्रश्न पत्रपरिषदेदरम्यान अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना विचारण्यात आला. यावर आंबेकर यांनी संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांना देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना आता औरंगजेबाचा प्रश्न समोर करून आंदोलन करणे योग्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेकर यांनी औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली.