ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईल – मनोज जरांगे

0
121

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरुन संघर्ष सुरु झाला आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरुन हा संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सगे सोयरे यांनाही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ओबीसी नेते एकटवले आहेत. ओबीसींनी याविरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी घेतला. तसेच राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईल, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केले. यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष रस्त्यावर तसेच न्यायालयात रंगणार आहे.

राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. या जीआरला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ओबीसी नेते घेत आहे. ओबीसी नेते या जीआर बाबत हायकोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेल. त्यांना जे काही करायचे ते करू द्या, मी पण मला जे करायचे ते करतो. असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील आज रायगडवर शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यापूर्वी त्यांनी हा इशारा दिला.

नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे सुटले नाही. नारायण राणे यांनी आरक्षणाच्या जीआरबाबत आपण समाधानी नाही. माझी भूमिका वेगळी आहे. सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी, मराठा असा संघर्ष होणार आहे, असे राणे यांनी म्हटले होते. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, ते एकटेच आहे जे मराठ्यांच्या अन्नात माती कालवायला बसले आहे.