उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान मुळे नवनीत राणा अडचणीत

0
263

अमरावती, दि. १२ (पीसीबी) : येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांचा प्रचार केल्याची माहिती समोर आल्यानंतर राणा दाम्पत्य अडचणीत आले आहे. आरोपी इरफानशी आमचे कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत. तो कोणत्या पक्षाचे काम करीत होता, याविषयी आपल्याला देणे-घेणे नाही. मारेकरी कुणीही असो, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सांगून आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. ही हत्या म्हणजे हिंदुत्वावरील हल्ला असल्याचे राणा दाम्पत्याचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, इरफान खानच्या फेसबुक पेजवर तो २०१९ च्या निवडणुकीदरम्यान नवनीत राणा यांचा प्रचार करीत होता, हे त्याने काढलेली छायाचित्रे आणि प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे. इरफानने लोकसभा निवडणुकीत राणा दाम्पत्याचा प्रचार केला होता, असे त्याचे शेजारी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगतात. नवनीत राणा या विजयी झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रतिक्रियादेखील इरफानने फेसबुकवर प्रसारित केल्या आहेत. काही छायाचित्रांमध्ये तो ‘पाना’ या निवडणूक चिन्हाचा प्रचार करताना दिसून आला आहे. इरफानने त्याचे फेसबुकवरील प्रोफाईल कुलूपबंद ठेवले आहे.

विशेष म्हणजे, राणा दाम्पत्य हे सातत्याने भाजपच्या निकट जात असल्याचे चित्र गेल्या अडीच वर्षांमध्ये दिसून आले. उमेश कोल्हे हत्या प्रकरण तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला होता, पण केंद्राने तत्काळ दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले, त्यामुळे सत्य उजेडात आल्याचे राणा दाम्पत्याचे म्हणणे आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ‘एनआयए’मार्फत चौकशीच्या मागणीचे पत्रही पाठवले होते.

दरम्यान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राणा दाम्पत्य आणि आरोपी इरफानचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजप हा राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात जातीय तेढ निर्माण करून मतांच्या ध्रुवीकरणाचा खेळ खेळत आहे. आमचे प्राण गेले तरी चालेल, पण अमरावती भाजपची प्रयोगशाळा होऊ देणार नाही. देशामध्ये ज्या हिंसक घटना घडत आहेत, त्या घटनांमागे भाजपचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असून अमरावती आणि उदयपूरच्या घटनांमध्येही ते दिसून आले आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केला. राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांच्या हत्येतील आरोपी मोहम्मद रियाझ अत्तारी हा भाजपचा कार्यकर्ता निघाला. अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान हा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा समर्थक होता असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.