उन्हाळ्यात मुलांना वारंवार ताप येतोय;पालकांनी घ्या अशी काळजी

0
1

दि.२६(पीसीबी)-उन्हाळा सुरू होताच लहान मुलांमध्ये तापाच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. तापासोबत अशक्तपणा, चिडचिड, घाम येणे, भूक न लागणे आणि डोकेदुखी अशी लक्षणेही दिसून येतात, तर काही मुलांना उलट्या आणि सौम्य जुलाब होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या तापमानामुळे वातावरणात जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात, त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. शाळेत जाणारी किंवा बाहेर खेळणारी मुले धूळ, घाण आणि दूषित पाण्याच्या संपर्कात येत असल्याने आजार पटकन होऊ शकतात.

याशिवाय, उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने शरीरातील पाणी आणि खनिजे कमी होतात. अनेक वेळा मुले पुरेसे पाणी पित नाहीत, त्यामुळे डिहायड्रेशन होऊन शरीराचे तापमान वाढू शकते. गंभीर परिस्थितीत Heat Exhaustion किंवा Heatstroke चा धोका निर्माण होतो, विशेषतः ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा मुलांमध्ये हा धोका अधिक असतो.

मुलांना निरोगी ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावणे गरजेचे आहे. ताक, लिंबूपाणी यांसारखे घरगुती पेय देणे फायदेशीर ठरते. तसेच मुलांना सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर खेळू द्यावे आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. आहारात ताजे, हलके आणि पौष्टिक पदार्थ तसेच फळांचा समावेश करावा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी आणि घाम आल्यावर कपडे बदलण्याची काळजी घ्यावी.

जर मुलाला वारंवार ताप, उलट्या, जुलाब किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी आणि वेळेवर उपचार केल्यास उन्हाळ्यातील तापापासून मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते.