उध्दव-राज एकत्र आले तर काय भाजपला फटका बसेल ?

0
21

मुंबई, दि . ४ ( पीसीबी ) – विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यात स्वबळ आजमवण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या. तर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेत मुंबईत १०७ जागांची मागणी केली. पण शहांनी शिंदेंना त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. यानंतर आता भाजपनं मुंबईत एक सर्वेक्षण केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी युतींसंदर्भात सकारात्मक विधानं केली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी युती झालीच तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे. त्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं. यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणं बदलू शकतात का, याचा ठाव घेण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे. दोन्ही ठाकरेंचा मतदार युतीनंतर काय करेल, त्यामुळे भाजपच्या मतांवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास भाजपकडून करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भाजपचा पारंपारिक मतदार, मोदी-शहा यांच्या नेतृत्त्वावर त्यांचा असलेला विश्वास आणि विधानसभेला मुंबईत भाजपनं केलेली कामगिरी या तीन बाबींमुळे शहरात भाजपची स्थिती मजबूत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी भाजपला उपनगरात चांगलं यश मिळालं होतं. मराठी मतदारांचं प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्येही भाजपनं लक्षणीय मतदान घेतलं होतं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नसल्याची माहिती अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची मंबईतील ताकद कमी झालेली आहे. पक्षाचे जवळपास निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या सेनेत गेले आहेत. याशिवाय राज ठाकरेंचा प्रभावही मर्यादित आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपवर त्याचा परिणाम होणार नसल्याचं सर्व्हे सांगतो. पक्षानं १५० जागा लढवल्यास फायदा होऊ शकतो, असंदेखील सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे.