ईडी छापे पड़लेले आता सर्व भाजपामध्ये

0
213

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. राज्यातले प्रकल्प बाहेर जात आहेत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसह भाजपवर टीका केली आहे. यांची वैचारीक पातळी खाली गेली असून भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांकडे बोलण्यासारख काहीच उरलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ज्यांनी आयुष्यात विमानाच्या आणि संरक्षणाच्या क्षेत्रात काही काम केलेलं नाही, अशा लोकांना हजारो एकरची जमीन कशाच्या जीवावर दिली? असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. स्वतःला वकील म्हणवणाऱ्यांनी आरोप करताना नैतिकतेचा विचार करावा. नैतिकतेची पातळी सोडून भ्रष्टाचाराचे आरोप सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटल आहे. इतकंच काय तर ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती, ती सगळी लोकं आता भाजप पक्षात आहेत. त्यांच्या केसचं काय झालं, असा प्रश्नही अरविंद सावंत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

भाजपने टूजीचे, थ्रीजीचे आरोप ज्यांच्यावर केले, तेच लोक आता केंद्रातील भाजप सरकारमध्ये खासदार आहेत, असं म्हणत सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एक भ्रम भाजपकडून निर्माण केला जातो, त्या भ्रमाचा आम्हालाही फटका बसला, असंही त्यांनी यावेळी बोलताना कबूल केलं आहे. चौकशी करायचीच असेल, तर राफेलची करा, असंही ते म्हणालेत.